पुणे - 'कर्जमाफीचा विषय नाही, शेतमालाचे भाव पाडून लुटणाऱ्यांचा हिशेब द्या. शेती प्रश्नासंबंधीचे केंद्रापासून राज्यापर्यंतचे धोरण बदलणार नाही, तोपर्यंत सातबारा कोरा होणार नाही. त्यासाठीच "देवेंद्र ते नरेंद्र' अशी (नागपूर ते गुजरात) शेतकरी आसूड यात्रा 11 एप्रिलपासून काढणार असून, ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही,'' असा निर्धार आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी येथे केला.
शेतकरी आसूड यात्रेला पाठिंबा देण्यासाठी युवक क्रांती दलातर्फे शेतकरी आसूड सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी होते. एक किलो ज्वारी आणि तांदूळ देऊन कडू यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, नागरिकांनी धान्य आणि आर्थिक स्वरूपात यात्रेसाठी मदत केली.
कडू म्हणाले, 'शेतकऱ्यांना कर्जमाफीची भीक नको, हमीभाव द्या. रात्रंदिवस मेहनत करून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविले; मात्र उत्पन्न वाढत नाही. आता या अन्यायाविरुद्ध पेटून उठले पाहिजे. कांदा, तूर महाग झाले, तर सरकार पडू शकते. भाव कोसळले तर मात्र, गावचा सरपंच देखील हालत नाही. रामदेवबाबांच्या औषधांना विदेशात प्रवास करता येतो, मग तुरीला का नाही?''
सप्तर्षी म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे, त्यामुळे मराठी माणसानेच हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यापुढील युद्धे अणुबॉंबने नाही, तर पाणी आणि अन्न-धान्यावर होतील. त्यामुळे शेती जगविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.'' दलाचे सहकार्यवाह संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
बदनामी मात्र शेतकऱ्यांची
'व्यसन आणि लग्नात खर्च केल्याने शेतकरी आत्महत्या करतात, हा चुकीचा आणि वाईट आरोप करण्यात येतो. काही आमदार, खासदार सर्वाधिक दारू पितात, असा आरोप करून ते आत्महत्या करतात का? एकतर शेतकऱ्यांना काही द्यायचे नाही, दुसरीकडे बदनाम मात्र करायचे, हे वेदनादायक आहे,'' अशी खंत कडू यांनी व्यक्त केली.
|