Raj Thackeray
Raj Thackeray Sakal

MNS Campaign : मनसेच्या मेळाव्यात ‘जय श्रीराम’चा नारा; २२ जानेवारीला उत्सव साजरा करण्याचे राज ठाकरेंचे आवाहन

अयोध्येत २२ तारखेला श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. मला तिथे राम मंदिर होण्यापेक्षा हे महत्त्वाचं वाटतेय की, ज्या कारसेवकांनी तिथे कष्ट घेतले, त्यांचे स्वप्न सत्यात उतरत आहे.

पुणे - अयोध्येत २२ तारखेला श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. मला तिथे राम मंदिर होण्यापेक्षा हे महत्त्वाचं वाटतेय की, ज्या कारसेवकांनी तिथे कष्ट घेतले, त्यांचे स्वप्न सत्यात उतरत आहे. त्या कारसेवकांसाठी कुणालाही त्रास न देता त्या दिवशी पूजा अर्चा करावी, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाबद्दल मनसेने आता आपली अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.

स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, वनिता बाविस्कर, अजय शिंदे, गणेश सातपुते आदी उपस्थित होते. श्रीरामचंद्राची मुर्ती भेट देत ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. राज ठाकरे यांनी मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी काळात ग्रामपंचायतीबाबत आणखी गांभीर्यानं विचार करण्याची गरज व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘स्थानिक समस्या तुम्हाला माहीत असून, स्वअनुभवातूनच तुम्ही त्या सोडवाल याची मला खात्री आहे. माझी फक्त एकच विनंती आहे, तुमचे गाव स्वच्छ ठेवा. अनेक भागांत स्वच्छतेसंबंधी दुरवस्था झाली आहे. अस्वच्छ वातावरणामुळे मन देखील अस्वच्छ होते. जगण्याची ऊर्मी ही भोवतालच्या वातावरणामुळे तयार होते. गावाचे वातावरण बदलून टाका आणि सर्वांची कामे करा.’ मनसेच्या हातातील सर्वात स्वच्छ ग्रामपंचायतीला पाच लाखाचा निधी मी स्वतः देईल, असे ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.

दुष्काळाची कामे करा...

राज्यात एप्रिल-मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळाची स्थिती असेल, याची जाणीव अनिल शिदोरे यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. ते म्हणाले, ‘‘दुष्काळाच्या तीव्र टंचाईतच निवडणुकांचा कालावधी आहे. या काळात घोषणा, सभा आणि देखाव्यात सर्वसामान्य दुष्काळग्रस्त माणूस भरडला जाईल. आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून कोणीही पाण्यावाचून वंचित राहता कामा नये याची काळी घ्यावी. जनावरांना चारा आणि दुष्काळाच्या कामांमध्ये सहभाग घ्यावा.’’

‘एकला चलो’चा नारा...

सध्याचे राजकीय पक्ष जाती धर्माच्या राजकारणात अडकले असून, आपण लोकहिताचे कामे करत ‘एकला चलो’चा नारा द्यावा, अशी भावना मेळाव्यातील वक्त्यांनी व्यक्त केली. राज्यातील दलबदलू राजकारणावर लोकांचा विश्वास उडाला आहे. मनसेकडे ते अपेक्षेने पाहत आहे. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांची कामे करावी, जनसेवेतूनच मतांचा आशीर्वाद मिळेल, अशी भावनाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com