बालेवाडी : गुरुवारचा दिवस होता सायंकाळची सव्वा सहाची वेळ, बालेवाडी येथील परशुराम तारे (वय ७४) हे भाजी खरेदीसाठी बालेवाडी तील दसरा चौक येथील शेतकरी आठवडे बाजारात भाजी खरेदीसाठी गेले होते .
दोन भाज्या घेऊन झाल्यावर त्याचे पैसे मोबाईल वरून ऑनलाइन दिले .त्यानंतर तिसरी भाजी घेतली आणि पैसे द्यायचे म्हणून शर्टच्या वरच्या खिशा मध्ये पाहू लागले, पण तिथे मोबाईल नाही हे लक्षात येताच, त्यांनी आरडाओरडा केला.
भाजीवाल्याला विचारणा केली. तेव्हा तुम्ही भाजी घेत असताना चार पाच तरुण मुल गर्दी करून तुमच्या भोवती उभे होती, त्यापैकी कोणी तरी तुमचा मोबाईल चोरला असावा असे सांगितले. मोबाईल महागातला होता ,त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मोबाईलला बॅके खाते जोडलेले होते व त्या संदर्भातील सर्व माहिती मोबाईल मध्येच होती.त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली. काय करावे काही सुचेना.
चोरांनी बँकेतले पैसे काढून घेतले तर पुढे काय करायचे ? या विचारात अंगाला दरदरून घाम फुटला. संध्याकाळची वेळ असल्याने बँक बंद झाली असणार. खाते कसे ब्लॉक करायचे? बँकेत कसा फोन करायचा? घरी कोणाला कसा फोन करून सांगायचं? कारण फोन नंबर पाठ नाहीत, सगळे नंबर मोबाईल मध्येच.विचारांचा गोंधळ मनामध्ये सुरू झाला. घरी येऊन पुतण्याला हा प्रकार सांगितला. त्या मोबाईल मध्ये
दोन सिम कार्ड होते त्यातले एक सिम कार्ड पुतण्याने ब्लॉक केले .परंतु दुसरे सिम कार्ड जे बँक खात्याशी जोडलेले होते ते काही ब्लॉक होईना .त्यामुळे मानसिक ताण अजूनच वाढला. रात्री उशिरा ते सिम ब्लॉक झाले तेव्हा जीव भांड्यात पडला.
अशा मोबाईल चोरीच्या घटना बाणेर बालेवाडी परिसरामध्ये वारंवार घडत आहेत. या भागात रोजच कोणत्या ना कोणत्या चौकात आठवडी बाजार भरतो व नागरीक भाजीसाठी इथे गर्दी करतात.याचाच फायदा घेऊन चोरटे , नागरिक त्यातल्या त्यात ज्येष्ठ नागरिकांना लक्ष करून मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरत आहे.
ज्येष्ठांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.त्यामुळे आठवडे बाजारामध्ये पोलिसांकडून गस्त घालण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत. जेणेकरून मोबाईल चोरीला आळा बसेल.
गेल्या सहा महिन्यांमध्ये अष्टविनायक चौकातील बाजारातून माझे प्रत्येकी चाळीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल एका मागोमाग चोरीला गेले आहेत. पोलीसात ऑनलाईन तक्रार केली आहे. पण पुढे काहीच माहिती उपलब्ध झाली नाही. मी ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे चतुशृंगी पोलीस स्टेशनला वारंवार जाणे मला शक्य होत नाही. पोलिसांकडून ही याबाबत कोणतीही माहिती कळवली जात नाही .
- राजीव शिरवईकर , बालेवाडी रहिवासी.
याभागातील आठवडी बाजारात बीट मार्शल कडून गस्त घालण्या विषयी सूचना देण्यात येतील.
-अजय कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतुशृंगी पोलीस ठाणे.
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना आपले मोबाईल सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. नवीन मोबाईल खरेदी करतो त्यावेळी त्याचा ई.एम.आय नंबर कुठेतरी लिहून ठेवा म्हणजे मोबाईल चोरी झाल्यानंतर या नंबरच्या आधारे पोलिसांनी तत्काळ मोबाईलचा शोध घेणे सोपे जाईल.
-राजकुमार केंद्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक, चतुशृंगी पोलीस ठाणे.