पुणे : दहा महिन्यांपासून टाळं तरी विद्यार्थ्यांना होस्टेल सोडवेना!

Pune_University_Hostel
Pune_University_Hostel

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाला गेल्या दहा महिन्यांपासून टाळे लागलेले आहे. या काळात अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्या, विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र, अद्यापही पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी वसतीगृह सोडलेले नाही.

एकीकडे पुणे विद्यापीठ नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांसाठी वसतीगृह सुसज्ज करत असताना दुसरीकडे या शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृह सोडवत नसल्याने नियोजनात अडथळे येत आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनास चौथ्यांदा नोटीस काढावी लागली आहे.

पुणे विद्यापीठात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह इतर राज्यातून शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. विशेषतः विद्यापीठात मुलींसाठीही नऊ वसतीगृह असल्याने अनेक पालक मुलींना उच्च शिक्षणासाठी पुणे पाठविण्यासाठी तयार होतात. यंदा कोरोनाचा प्रभाव असताना देखील विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये पदव्युत्तर पदवी व पदविकेला प्रवेश घेण्यासाठी २५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली, असून विद्यार्थ्यांचे प्रवेश देखील निश्‍चीत झालेले आहेत.

पुणे विद्यापीठाने ११ जानेवारीपासून विद्यापीठामध्ये थेट शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, पण राज्य शासनाने त्यास विरोध केल्याने अजून विद्यापीठातील वर्ग भरलेले नाहीत. राज्य सरकारकडून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, त्यामुळे नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृह रिकामे करण्यासाठी व साहित्य घेऊन जाण्यासाठी वसतीगृह विभागाने व्यवस्था निर्माण केली. लॉकडाऊनच्या काळात अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी साहित्य घेऊन नेले. अंतिम वर्षाच्या १ हजार ४९६ जवळपास ५२५ विद्यार्थ्यांनी नेलेले नाही. तर ९७० जणांनी खोल्या रिकाम्या करून दिल्या आहेत. ३७३ खोल्या रिकाम्या झालेल्या आहेत.

‘‘शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना खोली रिकामी करण्याबाबत यापूर्वीही सूचना देण्यात आली आहे. पण अद्याप काही विद्यार्थ्यांनी त्यांचे साहित्य नेलेले नाही. त्यासाठी त्यांना २७ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जे विद्यार्थी खोली प्रशासनाकडे सुपूर्त करणार नाहीत, त्यांच्या खोलीचा पंचनामा करून सर्व साहित्य एकत्र ठेवले जाणार आहे.’’
- सचिन बल्लाळ, मुख्य वसतीगृह प्रमुख, पुणे विद्यापीठ

अंतिम वर्षातील वसतीगृहात राहणारे विद्यार्थी - १४९६
साहित्य घेऊन गेलेले विद्यार्थी - ९७०
खोली न सोडलेले विद्यार्थी - ५२५
रिकाम्या झालेल्या खोल्या - ३७३

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com