नंदेश्वर (जि. सोलापूर) गावातील आणि आता पुण्यात स्थायिक झालेल्या २७ वर्षीय दत्ता करे या युवकाची कथा प्रेरणादायी अशीच आहे.
पुणे - घरची परिस्थिती बेताची...घालायला साधे कपडेही नव्हते... एकवेळच्या जेवणाची भ्रांत... परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही... आई शेतात काम करून संसाराचा गाडा हाकत होती... जनावरे राखण्याचे काम केले...भविष्याचा विचार करून पुण्याची वाट धरली...एका संस्थेत ऑफीस बॉयची नोकरी मिळाली...कष्ट व जिद्दीच्या जोरावर आज हाच तरुण एका कंपनीचा मालक बनला आहे.
नंदेश्वर (जि. सोलापूर) गावातील आणि आता पुण्यात स्थायिक झालेल्या २७ वर्षीय दत्ता करे या युवकाची कथा प्रेरणादायी अशीच आहे. दत्ता सांगतो, वडिलांच्या व्यसनामुळे भावंडांची काळजी आईच्या खांद्यावर होती. शेतात काम करून तर कधी गावातील लोकांकडून गोळा केलेल्या अन्नावर एकवेळच्या जेवणाची सोय होत असे. आईच्या एकटीच्या जिवावर सर्व काही सुरु होते. बिकट परिस्थितीतून बाहेर पडायचे हाच विचार नेहमी मनामध्ये होता. एके दिवशी पुण्यातील अहिल्या शिक्षण मंडळ या संस्थेत काही तरी काम मिळावे, यासाठी मोठ्या बहिणीने संस्थेचे संस्थापक सुरेश शेंडगे यांना विनंती केली. त्यांनी विनंती मान्य करून काम दिले.
दत्ता म्हणाला, ‘या संस्थेत पडेल ते काम केले. संस्थेच्या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी होते. दरम्यान एका मुलीशी ओळख झाली. त्या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. मुलीने बीएस्सी ॲग्री शिक्षण घेतल्याने ती सोबत राहील का? असा प्रश्न मनात येत होता. मात्र, आपण जिच्यावर प्रेम करतो आहोत, ती आयुष्यभर साथ देईल, याची खात्री पटली. त्यामुळेच लग्नाचा विचार केला, तिला रीतसर मागणी घातली. मात्र मुलीच्या घरच्यांनी नकार दिला. मात्र मुलीने साथ दिली.’’ पुढे बाहेर सुरक्षा रक्षकाचे काम मिळाले. काही दिवसांतच फिल्ड ऑफिसर म्हणून बढती मिळाली. त्यावेळी हाऊसकिपींग या कामाबद्दल माहिती मिळाली. अतिरिक्त काम म्हणून तेही करू लागलो. परिस्थिती सुधारत आहे, वाटत होते. त्यावेळी जिच्यावर प्रेम केले तिच्या सोबतच लग्न केले. असे दत्ता सांगतो. संसार सुरु झाला होता, रोज ठरल्याप्रमाणे कामावर जात होतो. असे किती दिवस दुसऱ्यासाठी काम करणार आहात, असा प्रश्न पत्नीने विचारला. स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा सल्ला तिने दिला.
‘हाऊस कीपिंग’ची आणि शेती कामाच्या अनुभवामुळे गार्डनची कामे घेण्यास सुरवात केली. २०१५ मध्ये कंपनी स्थापन केली. सुरवातीला एकटाच कामगार होतो. कामे वाढत गेल्याने आता ७० कामगार आणि एक फिल्ड ऑफिसर काम करतो. महिन्याकाठी ५ ते ६ लाखांची उलाढाल होते. सुखाचा संसार सुरु आहे. एक मुलगा आहे. स्वतःचे घर आणि चारचाकी गाडी घेतली आहे. त्यामुळे आता समाजात आणि सासरी देखील मान सन्मान मिळू लागला आहे. आईचे कष्ट फळाला आले असे वाटते. असे सांगताना दत्ता भावुक झाला.
स्वतःच्या कष्टावर आणि गावातील देवस्थानावर श्रद्धा आहे. कुटुंबाला मान सन्मान मिळून देयाचा होता. पत्नीने पाठिंबा दिला, त्यामुळे स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकलो. व्यसनामुळे किती त्रास होतो, याची जाणीव आहे, त्यामुळे व्यसनांपासून लांब आहे.
- दत्ता करे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.