Pradeep Garatkar : खासदार डॉ. कोल्हे यांना शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही का?

शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
Pradeep Garatkar
Pradeep Garatkarsakal

नारायणगाव - शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात आक्रोश मोर्चा काढणारे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही का? खासदार डॉ. कोल्हे यांनी तेथे आक्रोश मोर्चा का काढला नाही. अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार २५ जानेवारी २०२४ रोजी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी पुणे येथील नेहरू स्टेडियममध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे.

१८ जानेवारी रोजी मुंबई येथे महिलांचा मेळावा आयोजित केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ कमिट्यांची स्थापना करणे. या संदर्भात नियोजन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत नारायणगाव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी युवा नेते अमित बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य बबन तांबे, पापा खोत, सुप्रिया लेंडे, गुळुंचवाडीचे सरपंच अतुल भांबिरे, रामदास अभंग, अकिब इनामदार आदी उपस्थित होते. मात्र या बैठकीला आमदार अतुल बेनके, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार उपस्थित नव्हते.

खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भातला आक्रोश मोर्चा, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेली टीका, आमदार अतुल बेनके यांची तटस्थ भूमिका या संदर्भात पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष गारटकर यांच्याशी संवाद साधला.

याबाबत गारटकर म्हणाले, खासदार डॉ. कोल्हे यांनी नुकताच काढलेला आक्रोश मोर्चा हा एक राजकारणाचा भाग आहे. शेतकऱ्यांची खरंच काळजी असेल तर बंद पडलेल्या घोडगंगा साखर कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी आक्रोश मोर्चा काढावा.

शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांना ऐकू येत नाही का? मागील निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे अभिनेते असलेले खासदार डॉ. कोल्हे यांचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण झाले. ते आता उपमुख्यमंत्री पवार, वळसे पाटील यांच्यावर टीका करत आहेत. आगामी निवडणुकीत त्यांच्या विरोधात आमच्याकडे तुल्यबळ उमेदवार आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील चार आमदार आमच्या सोबत आहेत. उपमुख्यमंत्री पवार हेच पुणे जिल्ह्याचा विकास करू शकतात. आमदार बेनके तटस्थ असताना उपमुख्यमंत्री पवार यांनी तालुक्यातील विविध विकास कामांसाठी त्यांनी मागणी केलेल्या विकास कामांना सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आमदार बेनके आमच्या सोबत राहतील याची आम्हाला खात्री आहे. तालुक्याच्या विकासासाठी आमदार बेनके यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या सोबत राहणे तालुक्याच्या हिताचे ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com