राहुरी - मुळा धरणातून "जायकवाडी'साठी उद्या (सोमवारी) सकाळी अकरा वाजता दोन हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी माहिती दिली.
""मुळा धरणात आज सायंकाळी सहा वाजता 18 हजार 387 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. धरणातून एक हजार 900 दशलक्ष घनफूट पाणी "जायकवाडी'ला सोडण्याचा आदेश आहे. त्यानुसार उद्या मुळा नदीत दोन हजार क्यूसेकने विसर्ग सुरू होईल. टप्प्याटप्प्याने तो सहा हजार क्यूसेकपर्यंत वाढविला जाईल. नदीतील पाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी "जायकवाडी'चे अधिकारी येणार आहेत. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी त्यांचे वीजपंप काढून घ्यावेत. नदीत कोणीही उतरू नये,'' असे आवाहन मोरे यांनी केले आहे.
दरम्यान, नदीतील सर्व बंधाऱ्यांच्या फळ्या काढण्यात आल्या आहेत. नदीत पाणी सोडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे, असे शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले.
'जायकवाडी'ला पाणी सोडण्याविरुद्ध याचिका
कोपरगाव : जायकवाडीला सहा टीएमसी पाण्याची गरज असताना, नऊ टीएमसी पाणी का सोडायचे? सध्या नगर-नाशिक जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती आहे. याचा गांभीर्याने विचार करून जायकवाडीला पाणी सोडू नये, अशी याचिका गोदावरी कालवे पाटपाणी संघर्ष समिती व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक व न्या. सोनक यांच्या खंडपीठापुढे दाखल केली आहे.
विधिज्ञ प्रमोद एन. पाटील यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. बारमाही गोदावरी कालवे लाभधारकांचे 2012 पासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिणामी, येथील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. पाण्याच्या लढाईसाठी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेऊ, असे कोल्हे म्हणाले.
तालुक्यात डोंगरमाथ्यावर झालेल्या पहिल्या पावसात भातपिकांचे नुकसान झाले. नंतर पाऊसच झाला नाही. पहिल्या पावसाच्या आकडेवारीवरून तालुका दुष्काळी यादीतून वगळला गेला. आता साठलेले पाणी मराठवाड्याला नेण्याची घाई का? तालुक्यातील लोकांच्या भावना तीव्र असून, तरुणांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
- सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे खासदार
|