शहर पुनर्विकासासाठी ‘नागपूर पॅटर्न’

शहर पुनर्विकासासाठी ‘नागपूर पॅटर्न’

पिंपरी - ‘‘विकास आराखडे आखण्यापूर्वी अनियोजित पद्धतीने वसलेल्या शहरातील भागांचा नागपूर पॅटर्नप्रमाणे पुनर्विकास केला जाणार आहे,’’ अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. 

स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात विविध योजना राबविण्यात येत आहेत. तिथे यशस्वी झालेल्या व नागरिकांच्या सोयीच्या योजना शहराच्या इतर भागांत राबविण्यात येणार आहेत. चऱ्होली, वडमुखवाडी, रावेत, किवळे, ताथवडे यांसारख्या भागात नवीन रस्त्यांची निर्मिती स्मार्ट सिटीच्या नियोजनाप्रमाणे सुरू आहे. शहराच्या नियोजन आराखड्याशिवाय अस्ताव्यस्तपणे वसलेल्या भागाचा स्मार्ट सिटीअंतर्गत विकास कसा करणार, असा प्रश्‍न आहे. त्याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘शहरातील बहुतांश बांधकामे कुठल्याही नियोजन आराखड्याशिवाय नागरिकांनी बांधलेली आहेत. त्यांचा पुनर्विकास करावा लागणार आहे. त्यासाठी नागपूर महापालिका क्षेत्रात राबविलेल्या योजनेचा आधार घेतला जाणार आहे.’’ 

असे झाले नागपूर स्मार्ट
नागपूर महापालिका क्षेत्रातील अनियोजित पद्धतीने बांधकामे झालेल्या भरतवाडा, पूनापूर आणि भांडेवाडी परिसरातील १२०० हेक्‍टर क्षेत्रात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात आला आहे. यात १५ हजार नागरिकांनी गुंठेवारीपद्धतीने जागा घेऊन घरे बांधली होती. सुनियोजित रस्त्यांसाठी काही घरे तोडावी लागली. त्यांचा पुनर्विकास केला. वीज, पाणी, सांडपाणी, सुनियोजित रस्ते, रुग्णालये, शिक्षण अशा उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा पुरविल्या. प्रदूषणमुक्त वातावरण, चांगल्या दर्जाची परिवहन सेवा, उद्यान व हिरवळ, कौशल्य विकास केंद्र, ग्रंथालय, स्मशानभूमी आदींचा यात समावेश आहे. रिडेव्हलपमेंट आणि रिक्‍टो फिटिआ या माध्यमांचा वापर करावा लागला.

असे होईल आपले शहर
नागपूरमध्ये टीपी स्कीम केली आहे, त्याप्रमाणे आपल्याकडेही करणे शक्‍य आहे. स्मार्ट सुधारणा केल्या जातील. रस्त्यांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवले जातील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारेल. पोलिसांना वाहने मिळतील. रस्ते अद्ययावत होतील. हॉकर्स झोन तयार केले जातील. सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले जाईल. उद्याने विकसित केली जातील. येत्या पाच-दहा वर्षांत शहरात बदल होणार आहेत, त्यामुळे नागरिकांशी संवाद साधून त्यांचे आयुष्य चांगले करणे हा स्मार्ट सिटीचा पहिला टप्पा आहे. त्यानुसार कामे केली जात असून, चांगल्या पद्धतीने विकास करणे शक्‍य होत आहे.

नियोजनबद्ध विकसित शहर म्हणजे छंदबद्ध कविता, तर अनियोजित विकसित शहर म्हणजे मुक्तछंदातील कविता असते. त्यातही जशी अंतर्गत लय असते, तशी लय पकडून अनियोजित भागाचा पुनर्विकास करून शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे गरजेचे आहे. 
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com