मुळशीतील या श्रीमंत ग्रामपंचायतींचे कोरोनाकडे दुर्लक्ष 

corona
corona

पिरंगुट (पुणे) : ग्रामपंचायतींनी क्वारंटाइन सेंटर उभारून ग्रामनिधीचा वापर कोविड प्रतिबंधांच्या विविध उपाययोजनांसाठी करावा, अशी मागणी मुळशीतील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केली आहे. मात्र, मुळशी तालुक्यात करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींनी शासनाचा आदेश असूनही कोविड प्रतिबंधाच्या उपाययोजनांसाठी ग्रामनिधीचा वापर करण्यास टाळाटाळ केली आहे. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या १४ जुलैच्या लेखी आदेशानुसार, सक्षम ग्रामपंचायतींनी किमान ४ डॅाक्टर व आवश्यकतेनुसार इतर आरोग्य कर्मचारी यांना ग्रामनिधी अथवा इतर निधीमधून नियुक्त करण्यात यावे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये भाडेतत्वावर एका रुग्णवाहिकेची व्यवस्था करावी. त्यामधून रुग्णांना कोविड केअर सेंटर अथवा संकलन केंद्राकडे संदर्भित करावे. तसेच, प्रत्येक ग्रामपंचायतीने मार्गदर्शक सुचनांप्रमाणे एक कोविड केअर सेंटर तयार करण्यात यावे.  या आदेशाचा विचार करता तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील ठराविक ग्रामपंचायतींनीच या आदेशाची कार्यवाही केलेली आहे. 

माण, हिंजवडी व बावधन आदी तीन ग्रामपंचायतींनी काही खासगी डॅाक्टरांची नेमणूक केली असून, हिंजवडी ग्रामपंचायतीने अॅम्ब्यूलन्स उपलब्ध केली आहे. याशिवाय तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. ग्रामनिधीतून या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची असतानाही आर्थिकदृष्टया सक्षम असणाऱ्या ग्रामपंचायतींनी या आदेशाकडे काणाडोळा केलेला आहे.

मावळ- मुळशीचे उपविभागीय अधिकारी व तालुका तहसील प्रशासनाने काही ग्रामपंचायतींना लेखी आदेश काढून परिसरात क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यास सांगितले आहे. तालुक्यात ५६ क्वारंटाइन सेंटर सुरू करण्याचे आदेश तहसीलदारांनी यापूर्वीच दिलेले आहेत. मात्र, या आदेशाचेही अनेक सक्षम असणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या जास्त असणाऱ्या व  लोकसंख्येची घनता दाट असणाऱ्या ग्रामपंचायतींनी असे एकही क्वारंटाइन सेंटर सुरू केलेले नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या तालुक्यातील माण, मारुंजी, बावधन, म्हाळुंगे, भूगाव, पौड, घोटावडे व अन्य काही ठराविक ग्रामपंचायतींनी मिळून एकूण केवळ १६ क्वारंटाइन सेंटर सुरू आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या, लक्षणे नसलेल्या, परंतु आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार विलगीकरणाची गरज असणाऱ्या नागरिकांची कुचंबणा होत आहे.

याबाबत मुळशी तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण म्हणाले की, कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना म्हणून शासनाच्या आदेशानुसार व मावळ- मुळशीचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुळशी तालुक्यात सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा आणि इतर खासगी संस्थांमधून ५६ क्वारंटाइन सेंटर सुरू करण्याची शिफारस करून तसे आदेश संबंधित ग्रामपंचायतींना दिलेले 
आहेत. त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद स्थानिक स्तरावर ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून अथवा अन्य निधीतून करायची आहे. त्याचप्रमाणे सक्षम ग्रामपंचायतींनी कोरोनाविषयक उपाययोजनांसाठी ग्रामनिधीतून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत. ग्रामपंचायतींनी या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. 

मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार म्हणाले की, माण, हिंजवडी व बावधन आदी तीन ग्रामपंचायतींनी काही खासगी डॅाक्टरांची नेमणूक केली असून, हिंजवडी ग्रामपंचायतीने अॅम्ब्यूलन्स उपलब्ध केली आहे. तालुका प्रशासनाने सध्या ३ अॅम्ब्यूलन्स अधिग्रहित केलेल्या असून, गरजेनुसार त्यांचा वापर केला जात आहे. तालुक्यातील काही ठराविक ग्रामपंचायतींनी मिळून तालुक्यात सध्या एकूण १६ क्वारंटाइन सेंटर सुरू आहेत. पौडच्या पश्चिम भागात गरजेनुसार अशी सेंटर सुरु करणार आहोत.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com