पुणे : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या साडेआठ वर्षांपासून करणाऱ्या ठेकेदाराला पुन्हा मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मंगळवारी एका निवेदनाद्वारे केली.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी होता, त्याच्या सहापदरीकरणाचे काम १ ऑक्टोबर २०१० रोजी सुरू झाले. मूळ कंत्राटाप्रमाणे हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत संपणे अपेक्षित होते. मात्र, काम अद्याप सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) या कामाला सातत्याने मुदतवाढ दिली. या अपूर्ण कामामुळे गेल्या अकरा वर्षांत शेकडो अपघात झाले. त्यात अनेक नागरिकांचा बळी गेला. वाहतूक कोंडीमुळे हजारो कोटी रुपयांचे इंधन वाया गेले. मात्र, याची खंत कंत्राटदार आणि ‘एनएचएआय’ला नाही. तरीही दरवर्षी कंत्राटदाराला टोलचे दर मात्र वाढवून दिले जात आहेत.
एनएचएआयने या कंत्राटदाराला अनेक नोटिसा दिल्या आहेत, पण पुढे कारवाई काहीच झालेली नाही. त्यामुळे या रस्त्यावर अनेक कामे प्रलंबित आहेत, सेवा रस्तेही अनेक ठिकाणी अस्तित्वातच नाही आणि ज्या ठिकाणी आहेत, तेथे त्यांची अवस्था अनेक ठिकाणी दयनीय आहे, असे मंचने म्हटले आहे.
"हा टोल रस्ता असल्याने या संपूर्ण रस्त्याची देखभाल व दुरुस्ती कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे. त्यावर ‘एनएचएआय’ने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘एनएचएआय’च्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि काम पूर्ण होईपर्यंत या रस्त्यावरील टोल वसुली स्थगित करावी."
- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.