पुणे : ‘मानवाने नैसर्गिक चक्र बिघडविल्यानेच भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. परिणामी भूजलावर अवलंबून असलेली ६५ टक्क्यांहून अधिक शेती ही धोक्यात आली आहे. त्यामुळे मानवी अस्तित्व हे शेतीव्यवस्था व पर्यायाने शाश्वत पाणी व्यवस्थेवरच अवलंबून आहे. यासाठी मानवाने माती आणि पाण्याचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,’ असे मत आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी गुरुवारी (ता.२८) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या (इंडिया) पुणे लोकल सेंटरच्या वतीने प्रादेशिक भाषा संवर्धन उपक्रमांतर्गत ‘मानवी अस्तित्व आणि शाश्वत पाणी’ या विषयावर खास व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी वसंत पंदरकर, डॉ. उत्तम आवारी, विपिन मुनोत आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘प्रत्येकाने शाश्वत पाण्यासाठी म्हणजेच भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी लोकसहभाग, गरजांवर आधारित नियोजन, कामाची गुणवत्ता, राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनातील प्रामाणिकपणा यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. शाश्वत पाण्यासाठी मानवाने जेवढी नैसर्गिक संसाधने वापरली. तेवढ्याच प्रमाणात ती निसर्गाला परत केली पाहिजेत. निर्सगाकडून कोणीही काहीही फुकट घेता कामा नये.’’ शेवटी ‘रामराज्य’ यावयाचे असेल तर आधी ‘ग्रामराज्य’ आले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.
या वेळी पवार यांनी नगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या छोट्याशा दुष्काळी गावाचा कायापालट कसा केला, याची सविस्तर यशोगाथा सांगितली. पाणी हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन दीपक निघोट यांनी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.