‘एससीईआरटी’च्या प्रश्नसंचातील प्रश्न ‘आऊट ऑफ सिलॅबस’

SCERT
SCERT
Updated on

पुणे - दहावी-बारावीच्या परीक्षा डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) विद्यार्थ्यांसाठी घाईघाईने प्रश्नसंच (प्रश्नपेढी) तयार केले. हे प्रश्नसंच तात्काळ परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले, खरे! पण प्रश्नसंचामध्ये आउट ऑफ सिलॅबस’ प्रश्न असल्याने विद्यार्थ्यांचे ‘टेन्शन’ मात्र वाढले. आता तुम्ही म्हणाल, आउट ऑफ सिलॅबस’ प्रश्न कसे काय असतील!! अहो, मग एका, राज्य सरकारने यंदा कमी केलेल्या २५ टक्के अभ्यासक्रमावरील प्रश्नांचाही या संचात समावेश असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदा इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे. दहावी-बारावीपुरते बोलायचे झाले, तर कमी केलेल्या अभ्यासक्रम वगळून बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न विचारले जाणार, हे गृहित असल्यामुळे विद्यार्थी सध्या त्याचपद्धतीने परीक्षेची तयारी करत आहेत. परंतु परिषदेने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर सोमवारपासून उपलब्ध करून दिलेल्या प्रश्नसंचात २५ टक्के अभ्यासक्रम न वगळता संपूर्ण अभ्यासक्रमावरील प्रश्न दिले आहेत. त्यामुळे यंदासाठी आउट ऑफ सिलॅबस’ असणाऱ्या अभ्यासक्रमावरील प्रश्न संचात असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक देखील संभ्रमात पडले आहेत.

राज्यातील जवळपास ३० लाखांहून अधिक विद्यार्थी सध्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी तयारी करत असून ही तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांना काही ठिकाणी ऑनलाइन, तर काही ठिकाणी ऑफलाइन शिक्षण देण्यात आले. दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांना ताण येऊ नये, म्हणून राज्य सरकारने परिषदेला विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच तयार करण्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार परिषदेने तज्ञांच्या सहकार्याने प्रश्नसंच तयार केले. हे प्रश्नसंच परिषदेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्याची सुविधा सोमवारपासून उपलब्ध झाली. परंतु या प्रश्नसंचात १०० टक्के (सरकारने कमी केलेला अभ्यासक्रम न वगळता) अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेसाठी नेमका अभ्यास कसा करायचा, असा पेच विद्यार्थ्यांना पडला आहे. 

‘ते’ प्रश्न वगळणार : दिनकर टेमकर 
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे. त्यानुसार दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ठरलेल्या अभ्यासक्रमावर आधारितच प्रश्न विचारण्यात येतील. प्रश्नसंचात एकूणच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न आहेत. परंतु कमी केलेल्या २५ टक्के अभ्यासक्रमावरील प्रश्न संचातून लवकरच वगळण्यात येतील.’
- दिनकर टेमकर, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com