पुणे - देशाच्या विकासात महापुरुषांचे मोलाचे योगदान आहे. या महापुरुषांनी कधीही जात, धर्म न पाहता फक्त देशसेवेसाठीच काम
केले आहे. त्यामुळे ते देशाचे आधारस्तंभ असून, त्यांची जातीपातीत विभागू करू नका,'' असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी केले.
राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने दिले जाणारे 2017-18 व 2018-19 या दोन वर्षांचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार आणि पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार शुक्रवारी प्रदान करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, प्रशांत बंब, ऍड. गौतम चाबुकस्वार, प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे आदी उपस्थित होते. जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुंडे यांनी निषेध केला.
बडोले म्हणाले, 'मागासवर्गीय समाजाच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीमध्ये अद्यापही बदल झालेला नाही. सद्यःस्थितीत समाजातील केवळ नऊ टक्के समाजाकडे जमीन आहे. उर्वरित सर्व लोक आजही भूमिहीन व शेतमजूर आहेत. दरम्यान, महापुरुषांच्या स्मारकांसाठी राज्यातील 50 ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत.
त्या ठिकाणी लवकरच महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड आदींची स्मारके उभारली जातील.'' अण्णा भाऊ साठे महामंडळाला जास्त निधी देण्याचा सकारात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अण्णाभाऊंचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याचा सरकारचा मानस आहे. मागासवर्गीय मुले-मुली शिक्षणात मुले पुढे गेली पाहिजेत, यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
'बापट आमचे मॉनिटर'
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री बापट यांचा उल्लेख "आमचे नेते' असा केला. मी पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा, भाजपच्या आमदारांना त्यांच्याकडे रिपोर्टिंग करावा लागत असे. म्हणजे खरे अर्थाने ते भाजप आमदारांचे मॉनिटर होते. त्यामुळे मॉनिटर या नात्याने त्यांचा नेता, असा उल्लेख केल्याचे मुंडे यांनी सांगितले.
नाना पेठ : राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शुक्रवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या पुरस्कारांचे मानकरी.
|