पारगाव - आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील लोणी- धामणी परिसरात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल गुरुवारी सायंकाळी ढगफुटी सदृष्य मुसळधार पाऊस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र अचानक झालेल्या या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी नुकसान देखील झाले आहे.
पूर्व भागातील धामणी, लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी, शिरदाळे, पहाडदरा, रानमळा, वाळूंजनगर, खडकवाडी हि आठ गावे कायमची दुष्काळग्रस्त म्हणून ओळखली जातात. या भागातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून डिसेंबर महिन्यांनंतर परिसरातील काही वस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाला टँकर सुरू करावे लागतात.
या वर्षी या भागात पावसाने पाठ फिरवल्याने सप्टेंबर महिन्यात सुद्धा टँकर सुरु होते. मात्र काल गुरुवारी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने परिसरातील ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता काही ठिकाणचे बंधारे तुडूंब भरून वहात होते.
धामणी येथील गावालगतच्या ओढ्याच्या पुराचे पाणी पुलावर आल्याने काही तास वाहतूक बंद करण्यात आली होती.या मुसळधार पावसाने शेतीचे काही ठिकाणी नुकसान झाले असले तरी बळीराजा सुखावला आहे. खरीपातील पिके पावसाभावी वाया गेली असली रब्बीतील पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे.
या परिसरात जुलै २०१५ ला ढगफुटी सदृश पाऊस झाला होता. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी काल गुरुवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.या परीसरात गणरायाच्या आगमनापासून पाऊस सुरु झाला. मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात न झाल्याने विहिरी, नाल्यांमध्ये पाणीसाठा झाला नव्हता. त्यामुळे बाप्पाचे विसर्जन कुठे करावे ही चिंता गणेशभक्तांना पडली होती.
मात्र विसर्जनाच्या अगोदर पावसाने हजेरी लावली व सुमारे दिड तास पडलेल्या पावसाने विहिरी, नाल्यांमध्ये पाणीसाठा वाढला. त्यामुळे गणेश भक्तांनी पावसात भिजत उत्साहात बाप्पाचे विसर्जन केले. या परिसरातील पावसाळी बटाटा, चारा आणि शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी शेतीचे बांध आणि माती वाहून जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, अनिल वाळुंज, धामणीचे सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, माजी सरपंच सागर जाधव, मंगेश नवले, अक्षय विधाटे, प्रतिक जाधव, आनंदा जाधव, रामदास जाधव, पहाडदऱ्याचे संदेश कुरुकुटे, लोणीच्या माजी सरपंच ऊर्मिला धुमाळ, माजी सरपंच उद्धवराव लंके, प्रकाश वाळूंज, पिंटू पडवळ, वाळुंजनगरचे माजी सरपंच महेंद्र वाळूंज, जयेश वाळुंज व खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.