महाविसकास आघाडीचा पॅटर्न आता महापालिका-जिल्हा परिषदांमध्येही! 

महाविसकास आघाडीचा पॅटर्न आता महापालिका-जिल्हा परिषदांमध्येही! 

पुणे : एकत्रित लढलो तर भाजपच्या परंपरागत आणि सुशिक्षित मतदारांचा पायाही उद्‌ध्वस्त केला जाऊ शकतो, हा आत्मविश्‍वास विधान परिषद निवडणुकीच्या विजयाने महाविकास आघाडीला मिळाला. या विश्‍वासातूनच आता मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड या महत्त्वाची सत्ताकेंद्र असणाऱ्या महापालिकांमध्येही आघाडीचा पॅटर्न राबविला जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

"किती दिवस टिकणार?' या प्रश्‍नाला उत्तर देत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांनी मिळून स्थापन केलेल्या महाविकास विकास आघाडी सरकारला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर आज आघाडीने पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या जागा एकत्रितपणे जिंकून भाजपला जोरदार धक्का दिला. हा विजय तीन पक्षांच्या एकत्रित प्रयत्नातूनच झाला हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. या तीनही ठिकाणी वर्षानुवर्षे भाजपचा वरचष्मा होता.

सुरक्षित मतदार म्हणजे "भाजप' असेच चित्र होते, ते विधान परिषदेच्या निवडणुकीत पुसून काढण्यात महाविकास आघाडीला यश आले. पण यापुढच्या निवडणुकाही अशाच पद्धतीने लढविल्या तर आपल्याला यश मिळू शकते आणि सत्तेची फळे चाखायला मिळतात हेही आघाडीतील सर्व पक्षांना समजले आहे. त्यामुळे 2021 मधील नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर आदी महापालिकांची निवडणूक असू किंवा 2022 मधील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक असो, या एकत्रित लढण्याच्या चर्चेला आता बळकटी मिळाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेतून बाहेर काढून भाजपने जोरदार विजय मिळविला होता. या दोन्ही महापालिकेत कॉंग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे स्थान नगण्य राहिले. येत्या निवडणुकीत एकट्याच्या बळावर या दोन्ही महापालिकेत सत्ता मिळवणे आघाडीतील कोणत्याच पक्षाला शक्‍य नाही. पुण्यात भाजपचे शंभर नगरसेवक आहेत, पिंपरीतही स्पष्ट बहुमत आहे, अशा वेळी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवावी, असे पर्याय स्थानिक नेत्यांनी मांडले आहेत. मुंबई महापालिका ही शिवसेनेची खरी ताकद आहे. ही ताकद उद्‌ध्वस्त करण्यासाठी गेल्या निवडणुकीपासूनच भाजपने आपली शक्तीपणाला लावली होती. मुंबई ताब्यात घेण्याचे भाजपचे स्वप्न थोड्या जागांकरिता भंगले. शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत मुंबई हवीच असल्याने त्यांनी मुंबईही महाविकास आघाडी म्हणून लढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जर असे झाले तर भाजपला महापालिका राखणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.

प्रभाग पद्धतीतील बदल पथ्यावर-महापालिका निवडणुकीत भाजपने केलेली बहुप्रभाग पद्धती रद्द करून दोन सदस्यीय प्रभाग करण्यावर राज्यसरकारचे जवळ-जवळ एकमत झाले आहे. त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. दोनचा प्रभाग झाला तर राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेसला त्याला फायदा होईल. पुण्यात नवीन 23 गावे समाविष्ट केली तर राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे. त्यात महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली गेली तर भाजपला निवडणूक जिंकणे कठीण होणार आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com