पिंपरी चिंचवडकरांनो खूशखबर : पवना धरणात 31 जुलैपर्यंत  पुरेल इतका पाणीसाठा

पिंपरी चिंचवडकरांनो खूशखबर : पवना धरणात 31 जुलैपर्यंत  पुरेल इतका पाणीसाठा

पिंपरी : कोरोनामुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे. महिन्यापासून नागरिक लॉकडाऊनचे जीवन अनुभवत आहेत. शहर सील आहे. मात्र, शहरवासियांसाठी एक सुखद बातमी आहे. कारण, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट साठा आहे. तो 31 जुलैपर्यंत पुरेल इतका आहे. 

शहरातील नागरिकांना समान, पुरेसे व पुरेशा दाबाने पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने 25 नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. या निर्णयाला शनिवारी (ता. 25) पाच महिने पूर्ण होत आहेत आणि सध्या कोरोनाचे सावट व लॉकडाऊनचे जीवन जगावे लागत आहे. सध्या कारखाने बंद आहेत. सर्वजण घरात बसून आहेत. त्यात उन्हाळ्याची भर पडली आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. शिवाय, दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. महापालिकेकडे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत नव्वद टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर, काही सोसायट्यांना मागणीपेक्षा निम्मेच पाणी मिळत असल्याने टॅंकरचा आधार घ्यावा लागत असल्याच्या नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर पाणीपुरवठ्याची नेमकी स्थिती काय आहे, याचा घेतलेला आढावा. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तक्रारी घटल्या : निकम 
शहरात सम-विषम तारखांनुसार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे समन्याय पद्धतीने पाणी वितरण केले जात आहे. त्यामुळे पुरेशा दाबाने मुबलक पाणी नागरिकांना मिळत आहे. दोन दिवस पुरेल इतक्‍या पाण्याचा साठा करून ठेवावा लागत आहे. सध्या प्रतिदिन 480 दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाणी उचलत आहोत. शिवाय, एमआयडीसीकडून 30 दशलक्ष लिटर पाणी घेतले जात आहे. मात्र, नागरिकांच्या सोयीनुसार पाणी वितरणाच्या वेळा काही भागात बदलल्या आहेत. त्यामुळे पुरेसे पाणी नागरिकांना मिळत आहे, असे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मकरदं निकम यांनी सांगितले. 

मुबलक पाणी : गदवाल 
केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन यशस्वी करायचा आहे. त्यासाठी नागरिक घरातच थांबत आहेत. त्यांच्यासाठी पुरेसे पाणी गरजेचे आहे. सध्या उद्योगधंदे बंद असल्यामुळे त्यांच्याकडून पाण्याची मागणी कमी झाली आहे. शिवाय, या वर्षी पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठा मुबलक आहे. मात्र, घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. ऐरवी 850 दशलक्ष लिटर होणारा दररोजचा विसर्ग आता 900 दशलक्ष लिटर केला आहे. सुमारे 20 टक्के जादा पाणी सोडले जात आहे. त्याचा फायदा शहरी भागासह ग्रामीण भागालाही होत आहे. धरणात 31 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे, असे पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गदवाल यांनी सांगितले. 

काही सोसायट्यांना टॅंकरचा आधार 
आमची सोसायटी 112 सदनिकांची आहे. साधारणतः 500 लोकसंख्या आहे. आमची प्रतिदिन 100 युनिटची मागणी आहे. एक युनिट म्हणजे एक हजार लिटर याप्रमाणे आम्हाला दिवसाला एक लाख लिटर. सध्या आम्हाला 50 युनिटच म्हणजे 50 हजार लिटरच पाणी नळाद्वारे मिळत आहे. त्यामुळे दररोज चार ते पाच टॅंकर मागवावे लागत आहेत. दहा हजार लिटरच्या टॅंकरसाठी साडेसहाशे रुपये म्हणजे दिवसाला तीन ते साडेतीन हजार रुपये टॅंकरसाठी मोजावे लागत आहेत. महापालिकेकडे तक्रार करूनही उपयोग होत नाही, त्यामुळे आम्ही तक्रारी करणे सोडून दिले आहे, असे मत वाकडमधील एका सोसायटीच्या सचिवांनी व्यक्त केले. वाकड, विशालनगर परिसरात सुमारे 700 सोसायट्या आहेत, त्यांचीही हीच स्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दृष्टिक्षेपात पाणीसाठा 
गेल्या वर्षी 23 एप्रिल रोजी 2.50 टीएमसी अर्थात 33 टक्के पाणी साठा धरणात होता. तो या वर्षी आज 23 एप्रिल 2020 रोजी 4.19 टीएमसी अर्थात 48.30 टक्के आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com