गुगल मॅपची आवश्‍यकताच काय?

गुगल मॅपची आवश्‍यकताच काय?

पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक कोंडीचे गांभीर्य शासनाने जाणले नसले, तरी ‘गुगल’ने निश्‍चितच जाणले आहे. त्यातून हिंजवडीच्या रस्तोरस्ती फलक लावून गुगलने ‘लाइव्ह गुगल मॅप’ची जाहिरात सुरू केली आहे. त्याच्याच आधारे हिंजवडी आयटी क्षेत्रात काम करणारे निम्म्याहून अधिक कर्मचारी घरबसल्या ‘ट्रॅफिकचे हाल’ जाणून घेत आहेत. तथापि, आम्हाला या गुगलची आवश्‍यकताच लागू नये, अशी तरतूद शासकीय यंत्रणांनी करावी, असा आग्रह ‘आयटीयन्स’नी धरला आहे. किंबहुना, या समस्येचे मूळ शोधून काढावे, असेही त्यांचे म्हणणे आहे. 

अरुंद रस्ते आणि त्यावरील अतिक्रमणे हा येथील वाहतुकीतील मुख्य अडसर आहे. सबंध ‘हिंजवडी आयटी क्षेत्र’च अतिक्रमणांच्या घट्ट विळख्यात अडकल्याचे पाहायला मिळत आहे. हा विळखा दूर केल्यास वाहतुकीवरील ताण किमान २५ टक्‍क्‍यांनी कमी होईल, असे ‘फ्री अप हिंजवडी’चे समन्वयक करमचंद गर्ग यांचे म्हणणे आहे. त्याव्यतिरिक्तही जागतिक स्तरावर ‘टॉप टेन’मध्ये असलेल्या या ‘सिलिकॉन व्हॅली’च्या बकालपणास अतिक्रमणे आणि वाहतूक कोंडी, हे दोन्हीही घटक तितकेच जबाबदार आहेत. हिंजवडीमध्ये दररोज शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या परदेशी पाहुण्यांनीही तशा प्रतिक्रया दिल्या आहेत. हिंजवडीतील ‘विप्रो’, ‘इन्फोसिस’सारख्या मोठ्या कंपन्यांना शे-पाचशे परदेशी पाहुणे भेट देतात. त्यातीलच बहुतांश पाहुण्यांनी वाहतूक समस्येसह बकालपणाबद्दल टिप्पणी केली आहे. सुधीर देशमुख यांनीही नुकताच असा अनुभव घेतला. नेदरलॅंडसहून आलेल्या पाहुण्याच्या ‘मार्निंग वॉक’साठी बराच काथ्याकूट करावा लागल्याचे ते म्हणाले. 

हिंजवडीलगतच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामास असलेल्या या पाहुण्याने येथे ‘मॉर्निंग वॉक’ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथील ९० टक्के रस्त्यांचे पदपथ व्यावसायिकांनी गिळंकृत केल्याने त्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. तशी नराजीही त्याने व्यक्त केली. अखेरीस देशमुख यांनी त्याला हिंजवडीतील हाउसिंग सोसायटीमध्ये ‘वॉक’ची सोय करून दिली. खरेतर, स्वत:ला ‘पुरोगामी’ म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्र शासनासाठी ही शरमेची बाब आहे. हिंजवडीबाबतच्या उदासीनतेमुळे आंतरराष्ट्रीय पटलावर ‘भारत’ पर्यायाने ‘महाराष्ट्रा’ची प्रतिमा मलीन होत आहे. आपला देश ‘बकालता’ आणि ‘पंचतारांकित’ अशा दोन भागांमध्ये विभागल्याची प्रतिक्रिया हे परदेशीय व्यक्त करत आहेत. 

अतिक्रमणांचा सुळसुळाट
हिंजवडीच्या ‘एंट्री पॉइंट’पासून टप्पा तीनपर्यंत रस्त्यांवर अतिक्रमणांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. हिंजवडी उड्डाण पुलालगत (हिंजवडीच्या दिशेने) व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे तीनपदरी रस्ता अचानकपणे निमुळता होत जातो. पिंपरी-चिंचवड महापालिकेने या रस्त्याची मोजणी करून आखणीही झाली आहे. मात्र, मूठभर व्यावसायिकांच्या आडमुठेपणामुळे ‘आयटी वर्ग’ नाहक भरडला जात आहे.

अरुंद रस्ते, रस्त्यांची दुरवस्था, अतिक्रमणे आणि वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या ही येथील मूळ समस्या आहे. स्थानिक पातळीवर आम्ही उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये ‘डेडिकेटेड बस लेन’ आणि ‘मोटारसायकल कॉन्ट्रा लेन’चा समावेश आहे. हिंजवडी पुलापासून शिवाजी चौकादरम्यान त्या आहेत. त्याव्यतिरिक्तही ‘पिक अवर्स’मध्ये सिग्नल यंत्रणा बंद ठेवून आम्ही वाहतूक नियमन करतो. त्यामुळे वाहतुकीचा बराचसा प्रश्‍न सुटत असला तरी, वाहनांच्या विशेषत: चारचाकींच्या वाढत्या संख्येमुळे पोलिस यंत्रणा ही केवळ मलमपट्टी ठरते. 
- दत्तात्रेय पाटील, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com