काश्‍मीरमधील गळचेपी योग्य नाही : नंदिता दास (व्हिडिओ)

nadita-das.jpg
nadita-das.jpg

पुणे : "जम्मू काश्‍मीरसंबंधी 370 कलम हा जटिल मुद्दा असू शकेल; पण त्यावर चर्चा व्हायला हवी होती. हे कलम रद्द केल्याने पुण्या-मुंबईतील लोकांना परिणाम होणार नाही; पण ज्यांच्या जीवनावर परिणाम होणार आहे, त्यांना विचारायला पाहिजे होते. त्यांना माहितीच होऊ द्यायची नाही, लोकशाही व्यवस्थेत हे योग्य नाही,'' असे मत अभिनेत्री नंदिता दास यांनी यांनी व्यक्त केले. 

'मिळून साऱ्याजणी' या मासिकाच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त कोथरूड येथील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात त्यांची मुलाखत घेण्यात आली. या वेळी त्या बोलत होत्या. दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. 

कसाबच्या फाशीचा मुद्दा, जमावाकडून मारहाण, याबरोबरच चित्रपटसृष्टीतील प्रवासाबाबत त्यांनी भाष्य केले. मुलाखत सुरू होताच, 'मुझे आम अच्छे लगते हैं,' 'सध्या पुरस्कार कुणाला देतात, हे सर्वांना माहिती आहे. उरी चित्रपट पाहिला नाही, पण तो चांगला असेल,' असे सांगत त्यांनी कुणाचेही नाव न घेता सूचक भाष्य केले. रूप-रंगाला अधिक महत्त्व का दिले जाते? त्यामुळे मुलींमध्ये आत्मविश्‍वासाचा अभाव निर्माण होतो, असे त्यांनी सांगितले. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश, सफदर हश्‍मी यांसारख्या लोकाच्या हत्या होऊनही आपले जीवन सर्वसामान्य पद्धतीने सुरू आहे, याचा त्रास होतो. लोकांना मारणाऱ्यांना कुणीच बोलत नाही; पण प्रेम करणाऱ्याला मारले जाते. कसा समाज आपण तयार करीत आहोत? आपला देश एवढा का बदलला आहे, याचा विचार करावा लागेल, असे सांगतानाच आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले

अनेक महाविद्यालयांमध्ये जाते, त्या वेळी, "मी जीन्स का घालू शकत नाही. त्यासाठी माझ्या आई-वडिलांना कसे समजावू', हे प्रश्‍न आजही मुलींकडून विचारले जातात. म्हणजे समाजात अजूनही स्त्री-पुरुष समानता नाही. त्यामुळे प्रत्येकाला स्त्री अधिकारवादी (फेमिनिस्ट) व्हावे लागेल. ही समानता निर्माण होईल, त्या वेळी हा शब्द बदलता येईल,'' असे त्या म्हणाल्या. 

सामाजिक परिस्थिती चिंताजनक : बाळ 
सध्याच्या सामाजिक, राजकीय परिस्थिती चिंताजनक आहे. मनातील खरे बोलता येईल का, बोलले तर काय होईल, असे भय अनेकांच्या मनात आहे. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरू आहे, अशी टीका मासिकाच्या संस्थापक संपादक विद्या बाळ यांनी केली. या कार्यक्रमात मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. गीताली वि. मं., सोनाली दळवी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com