पुणे : काही जणांकडून तात्कालिक कारणामुळे, तर काहींच्या हातून जाणीवपूर्वक गुन्हे घडले. त्याची शिक्षा वेगवेगळ्या कारागृहांमध्ये बंदीजन बनून ते भोगत आहेत. असे असतानाही आपल्या देशाविषयी त्यांच्या मनात कायम कृतज्ञता व ओढ आहे. हेच प्रेम शेकडो बंदीवानांनी राष्ट्रभक्तीपर निबंध लिहून व्यक्त केले. निमित्त होते रामचंद्र प्रतिष्ठानने घेतलेल्या राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेचे!
स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या वेगवेगळ्या कारागृहांमध्ये प्रतिष्ठानने ही निबंध स्पर्धा घेतली. त्यामध्ये येरवडा कारागृहासह मुंबई, ठाणे, नाशिक रस्ता मध्यवर्ती कारागृह तसेच रत्नागिरी विशेष कारागृह, भायखळा व सातारा जिल्हा कारागृहांमधील बंदीजनांनी उत्स्फूर्त भाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते नुकतेच बक्षीस देण्यात आले.
स्पर्धेसाठी "स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार व कार्य' या विषयासह "मला भावलेले क्रांतिकारक', "राष्ट्र उभारणीसाठी आपण काय करू शकतो' यांसारखे विषय देण्यात आले होते. त्यामध्ये अनेक बंदीजनांनी उत्कृष्ट निबंध लेखन केले. बक्षीस वितरणावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
"बंदीजनांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या निमित्ताने बंदीजनांच्या लेखणीला वाव मिळाला. अनेकांनी अतिशय चांगले निबंध लिहिले. या उपक्रमाचे बंदीजनांबरोबर पोलिस अधिकाऱ्यांनीही कौतुक केले.'' अशोक शिंदे, अध्यक्ष, रामचंद्र प्रतिष्ठान.
स्पर्धेतील एकूण सहभागी बंदीजन - 900
पुरुष स्पर्धक - 700
महिला स्पर्धक - 200
पुण्यातील स्पर्धक - 200
पुरुष स्पर्धक - 150
महिला स्पर्धक - 50
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.