
वालचंदनगर (पुणे) : ऊस हे पीक एकमेव खात्रीशीर उत्पन्नाचे आहे. उसामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक सुबत्ता आली आहे. उसाचे क्षेत्र अन्य पिकांकडे वळविण्याची शिफारस शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. केंद्र सरकारने उसाचे क्षेत्र कमी करण्याचा निर्णय घेतल्यास जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी दिला.
जाचक यांनी सांगितले की, अतिरिक्त उसाचा व साखरेचा प्रश्न सोडविण्यासाठी देशातील उसाखालील ३ लाख हेक्टर शेती अन्य पिकाकडे वळवावी, अशी शिफारस निती आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. सध्या देशातील सुमारे ५२ लाख हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. यातील ३ लाख हेक्टर उसाचे क्षेत्र अन्य पिकासाठी वळवून पिकामध्ये बदल करणाऱ्या शेतकऱ्यांनी हेक्टरी ६ हजार रुपयांचे अनुदान तीन वर्षासाठी देण्यात यावे, असे सुचविण्यात आले. हा निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे.
जाचक म्हणाले की, साखर उद्योग हा देशातील क्रमांक दोनचा समजला जातो. सहकारी साखर कारखान्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आयुष्य बदलले आहे. इतर पिकांच्या तुलनेमध्ये ऊस हे एकमेव खात्रीचे पीक आहे. उसाची लागवड केल्यानंतर उसाचे गाळप खात्रीशीर होत असते. दर कमी जास्त मिळतो. मात्र, शेतकऱ्यांना ऊस पिकामुळे हक्काचे पैसे मिळतात. द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला व इतर पिकांची लागवड करुन उत्पादन घेतल्यानंतर या पिकांची विक्री व दराची शंभर टक्के खात्री नसते. तसेच, दरही कमी जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
इतर पिकांच्या तुलनेमध्ये उसाला पाणी जास्त लागत असले, तरीही ठिबक सिंचनाचा वापर करुन उसाचे उत्पादनाचे घेतल्यास पाण्याची बचत मोठ्या प्रमाणावर होत आहे. उसाचे क्षेत्र कमी करण्याची शिफारस शेतकऱ्यांच्या विरोधात असून, याच्या विरोधात आवाज उठवणार आहे.
- पृथ्वीराज जाचक,
माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.