पुणे : पत्नीपासून अलिप्त होण्यासाठी घटस्फोटाचा दावा जातपंचायतीऐवजी न्यायालयात दाखल केल्याने मुलाच्या कुटुंबास वाळीत टाकणाऱ्या जातपंचायतीच्या 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या आकुर्डी शाखेने केलेल्या पाठपुराव्यामुळे तीन वर्षांपासून बहिष्कृत असलेल्या सागरे कुटुंबास दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी अंनिसने केली आहे.
करेप्पा मारुती वाघमारे, बाजीराव करेप्पा वाघमारे, साहेबराव करेप्पा वाघमारे, बाळकृष्ण करेप्पा वाघमारे (सर्व रा. वाल्हेकरवाडी), मोहन शामराव उगाडे (रा.ताथवडे), मनोज सागरे, विजय सागरे (रा. वारजे माळवाडी), रामदास भोरे (रा. हिंजवडी), अमर भोरे, महादेव भोरे, अमृत भोरे, गोविंद भोरे (रा. मुंबई), मारुती वाघमारे (रा. उरूळी कांचन), विष्णू वाघमारे (उडगी, अक्कलकोट) यांच्याविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात सामाजिक बहिष्कार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिताराम कृष्णा सागरे (वय 33, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली होती. सीताराम सागरे यांचा शितल भोरे यांच्याशी विवाह झाला होता. मार्च 2018 मध्ये पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणानंतर शितलच्या माहेरच्यांनी तिला नेले. दरम्यान, सागरे यांनी पत्नी शितलपासून घटस्फोट घेण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात दाव् दाखल केला होता.
दरम्यान, जातपंचायतीऐवजी न्यायालयात दावा दाखल केल्याने आरोपींनी सागरे कुटुंबीयांना तीन वर्षे बहिष्कृत केले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अंनिसच्या आकुर्डी शाखेने सागरे कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना सर्वतोपरी मदत केली. त्यामुळे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसचे प्रकाशन विभागाचे विशाल विमल व कायदेविभागाच्या ऍड.मनीषा महाजन यांनी मागणी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.