पुणे - कोरोनामुळे ऑनलाइन शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लिखाणाची गती मंदावली आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना आगामी ऑफलाइन लेखी परीक्षेत बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महापालिकेच्या शाळेतील इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खास लिखाण वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
गेल्या दीड वर्षापासून करोना संकटामुळे शाळा बंद होत्या. या काळात विद्यार्थ्यांनी जास्त लिखाण केलेले नाही. त्याचा परिणाम त्यांच्या हस्ताक्षरासह लिखाणाच्या गतीवर झाला आहे. यंदा इयत्ता १० वी व १२ वीची वार्षिक परीक्षा ऑफलाइन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांना गतीने उत्तरपत्रिका सोडवता आली नाही तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या गुणवत्तेवर होणार आहे. त्यामुळे या मुलांसाठी महापालिकेकडून हस्ताक्षर सुधारणा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका शाळांमध्ये प्रामुख्याने आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांची मुले शिक्षण घेतात. लॉकडाऊनच्या काळात अनेकांकडे तर ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल, इंटरनेटची सुविधाही नव्हती. त्यामुळे अनेक मुले शिक्षणापासून दूर राहिली आहेत. विद्यार्थ्यांची अभ्यासाची, लिखाणाची सवय मोडली आहे, त्यामुळे माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांच्या मुलांसाठी हस्ताक्षर सुविधा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
‘इयत्ता ८वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर सुविधा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात यासाठी ९० मुलांचा समावेश केला आहे.’
- शिवाजी दौंडकर, शिक्षण अधिकारी, माध्यमिक विभाग, महापालिका
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.