पुणे - देशाला सशक्त बनवायचे असेल, तर समाजातील सर्व घटकांना घेऊन पुढे जायला हवे. समाजातील विशेष मुले ही केवळ त्यांच्या पालकांची किंवा शिक्षकांची जबाबदारी नाही, तर ती आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यांना त्यांच्या पायावर उभे करून त्यांना समर्थ करण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, असे मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले.
हिंद शक्ती सोशल फाउंडेशन व विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टतर्फे सुहृद मंडळ संचलित मूक-बधिर शिक्षण केंद्रातील विशेष विद्यार्थ्यांना अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभय आपटे, नगरसेविका नीलिमा खाडे, हेमचंद्र दाते, मुख्याध्यापिका स्मिता उबाळे, डॉ. वासंती देशपांडे, जयश्री नाईक, पुरुषोत्तम पाटील, आयोजक सुनील पांडे, अभिजित मोडक, भूषण मोरे या वेळी उपस्थित होते.
आपटे म्हणाले, 'विशेष मुलेदेखील सक्षम आहेत; परंतु ती आपल्यापेक्षा वेगळ्या आणि अधिक चांगल्या पद्धतीने सक्षम आहेत. मदतीसाठी केवळ शासनावर अवलंबून राहण्यापेक्षा, स्थानिक पातळीवरील मदत कशा पद्धतीने मिळविता येईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
शासनानेदेखील दिव्यांगांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्यांचा वापर करीत विशेष मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा.''
|