सरकार बहीरे झाल्याने सर्व शाळा बंद ठेवणार - संभाजीराव थोरात

सरकार बहीरे झाल्याने सर्व शाळा बंद ठेवणार - संभाजीराव थोरात

सोमेश्वरनगर -  सरकारने रोज नवे परिपत्रक काढून शिक्षकांना वेठीस धरले असून ऑनलाईनच्या नावाखाली मानसिक संतुलन बिघडवले आहे. बदल्यांचे नियम तुघलकी असून त्यासाठी रस्त्यावर उतरल्यावरही सरकार संवादाला तयार नाही. शासन बहीरे झाले असल्याने आता राज्यातील सर्व प्राथमिक शाळा बेमुदत बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडणार आहोत, असा इशारा माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी दिला आहे. 

सात महिने उलटले तरीही शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ अजून मिटलेला नाही. लाखो शिक्षक रस्त्यावर उतरल्यानंतरही प्रशासनाने बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करत आणली असली तरी अद्याप एकाही शिक्षकाच्या हातात आदेश दिलेला नाही. अधिकारी बदल्या होणार असे सांगतात आणि मंत्रिगण माध्यमांमधून मेमध्येच बदल्या होणार असल्याचे सांगतात. या घोळात सध्या प्रक्रिया थंडावली असल्याने शिक्षक आणखीनच बुचकळ्यात पडले आहेत. याबाबत थोरात यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

थोरात म्हणाले, मराठी शाळांच्या गुणवत्तेसाठी शिक्षक राबत असतानाही गैरसोयीच्या बदल्या आणि ऑनलाईनचा धडाका यामुळे ते दहशतीखाली आले आहेत. आत्महत्येपर्यंत पोचले आहेत. लाखो शिक्षक रस्त्यावर उतरूनही शासन संवादाची भूमिका घेत नाही. रोज नवा जी आर काढून शिक्षकांवर अन्याय करत आहे. गुणवत्ता वाढीचा कोणताही ठोस शैक्षणिक कार्यक्रम शासनाकडे नाही. ऑनलाईन च्या नावाखाली शिक्षकाचे मानसिक संतुलन खराब करायचे आणि अशैक्षणिक कामांचा सतत बोजा लादून गुणवत्ता ढासळत असल्याची आवई उठवायची असा डाव सुरू आहे. बदल्यांचे तुघलकी नियम लादून शिक्षकाला दबावाखाली आणले आहे. सरळ सरळ हे मराठी शाळा बंद पाडण्याचे आणि इंग्रजी शाळा वाढविण्याचे षडयंत्र आहे. गल्लाभरू संस्था टिकवण्यासाठी गरीबांच्या मुलांच्या शिक्षणाची त्यांना फिकीर नाही. परंतु याविरोधात राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन प्राणपणाने विरोध करणार आहेत. शासन बहिरे झाले आहे यामुळे आता विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरी शाळा भरवू परंतु राज्यातील सर्व प्राथमिक शाळा बेमुदत बंद ठेवू असा निर्वाणीचा इशारा सरकारला देत आहोत.

शिक्षकांच्या बदल्यांना विरोध नाही. फक्त त्या अन्यायकारक नकोत अशी आमची भूमिका आहे. सर्व अशैक्षणिक कामे बंद करून फक्त शिकवू द्या. यानंतर तक्रार आली तर कान पकडा. परंतु सरकार आम्हाला बदल्या नकोत असा खोटा प्रचार करून गुरूजींची प्रतिमा मलिन करत आहे. यासाठी आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संघटना एकत्र येऊन लढा देणार आहोत. अण्णा लवकरच याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहितीही थोरात व संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com