पाणी, रस्त्यांची गरज

पाणी, रस्त्यांची गरज

पुणे - शहराच्या पूर्वेकडील उंड्री गावात मोठमोठ्या इमारती, बंगले उभे राहिले; पण गावात पिण्याचे पाणी मात्र नाही. दुसरी बाब म्हणजे, येथील अपुऱ्या आणि खराब रस्त्यांमुळे गावाभोवती होणारी वाहतूक कोंडी गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. ‘गावाला पिण्याचे पाणी मिळाले, तरच महापालिकेत गाव घेतल्याचा आनंद होईल,’ अशी गावकऱ्यांची भावना आहे. तर, मुंढव्यात (उर्वरित केशवनगर) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा समक्ष व्हावी, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. पाणी, वाहतूक या सुविधा पुरवितानाच, या गावांमध्ये घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, सुटसुटीत रस्त्यांच्या बांधणीची गरज असल्याचे आढळून आले. 

उंड्री
हडपसरपासून जवळच असल्याने गेल्या काही वर्षांत उंड्रीतील नागरीकरण वाढले आहे. साहजिकच, गावाच्या वाढीचा ताण मूलभूत सेवा-सुविधांवर आल्याने विशेषतः पाणी, रस्ते या सुविधा अपुऱ्या ठरू लागल्या आहेत. याच काळात बांधकामे वाढली. विशेष म्हणजे, काही प्रमाणात घरांच्या किमती कमी असल्याने या भागाला नागरिकांनी पसंती दिली; परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे गावकऱ्यांना महापालिकेच्या हद्दीतून पाणी आणावे लागते. वाढत्या नागरीकरणाला पुरेसे पाणी येथे उपलब्ध नाही. इथे छोटी-मोठी बाजारपेठ उभी राहिली, वाहनांची वर्दळही वाढली. परिणामी, उपलब्ध रस्ते फारच तोकडे ठरत आहेत. त्यामुळे उंड्री चौक, उंड्री- मंतरवाडी, उंड्री- हडपसर या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. मात्र, वाहतूक नियोजनाची यंत्रणा नसल्याने ही समस्या बिकट झाल्याचे चित्र गावाला जोडलेल्या रस्त्यांवर दिसते. रस्त्यालगतच्या नव्या बांधकामांमुळे अतिक्रमणांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे, ती काढल्यास काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होऊ शकते, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात गावात आरोग्य सुविधा आहे; पण त्याची व्याप्ती वाढविण्याची आवश्‍यकता आहे. याशिवाय, बदलत्या उंड्री गावाचा विचार करून उद्याने, शाळा उभारण्याचे नियोजन करावे, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. गावात रोज मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. त्यानुसार कचरा गोळा करणारी यंत्रणा उभारण्याचे गावाचे नियोजन आहे. त्यासाठी महापालिकेने आतापासून सहकार्य करावे, अशी येथील लोकप्रतिनिधींची मागणी आहे. गावाची वाढ लक्षात घेता, सध्या पाणी कमी पडते आहे, त्यामुळे महापालिकेत गाव घेतल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न प्राधान्याने सोडविण्याची मागणी उंड्रीचे सरपंच नितीन घुले यांनी केली.

मुंढवा (उर्वरित केशवनगर)
खराडी, चंदननगर या भागाबरोबरच मुंढवा (उर्वरित केशवनगर) ही विस्तारत आहे. सध्या गावाची लोकसंख्या सुमारे ६० हजार आहे. गावातील मोकळ्या जागा उपलब्ध झाल्याने बांधकाम व्यावसायिकांनी मुंढव्याला पसंती दिली. नाल्यांवर राडारोडा टाकून बांधकामे करण्यात आली असल्याचे गावात फिरल्यानंतर दिसून आले. मुंढव्यातील प्रमुख रस्ते अरुंद असले, तरी त्यांचा दर्जा नसल्याचे दिसून आले. इमारतींमध्ये पार्किंगची सोय न केल्याने वाहने रस्त्यावरच उभी करण्यात येतात. नव्या इमारती बांधल्या; पण तेथील रहिवाशांसाठी पाणी, रस्ते, पथदिव्यांची सोय करण्यात आलेली नाही, त्यामुळे या भागातील रहिवाशांचे हाल होत असल्याच्या तक्रारी आहेत. ज्या प्रमाणात गाव वाढले, त्या तुलनेत पायाभूत सुविधा नसल्याचे जाणवले. त्यात प्रामुख्याने घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन), दवाखाने या बाबींचा समावेश आहे. गावाच्या काही भागांतील रस्त्यावरच कचरा पडलेला असतो. गावातील कचरा गोळा करण्यासाठी वाहने असली, तरी त्यांचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे आता घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची यंत्रणा असावी, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. मुळात, गाव वाढत असल्याने पायाभूत सुविधा कमी पडत असल्याच्या स्थितीतही, गावाभोवती अजूनही मोठ-मोठ्या इमारतींची कामे सुरू आहेत. 

त्यामुळे नजीकच्या भविष्यात नागरीकरण वाढणार हे स्पष्ट आहे. त्याकरिता गावातील विकासकामांचे प्रभावी नियोजन करून, त्यांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. गावात खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पण, सार्वजनिक वाहतुकीची आवश्‍यकता असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ची सेवा सुधारून बसगाड्यांची पुरेशी आणि  वेळेवर उपलब्धता व्हावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com