सिंहगड - अगोदरच खडकवासला धरणाच्या आजूबाजूच्या गावांतील सांडपाणी, हॉटेल, फार्महाऊस, रिसॉर्ट व कंपन्यांतील सांडपाणी, गावठी दारूच्या भट्ट्यांतील घाण धरणाच्या पाण्यात मिसळून पाण्याचे प्रदुषण होत असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मागील काही महिन्यांपासून थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात मृतांच्या अस्थी,राख,कपडे व इतर वस्तूंचे राजरोसपणे विसर्जन करण्यात येत असल्याने आता पाणी प्यायचे की नाही? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
पुणे-पानशेत रस्त्याला लागून सोनापूर गावच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरातून मृतांचे नातेवाईक थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात अस्थी व इतर वस्तूंचे विसर्जन करण्यासाठी येत आहेत.
मागील काही दिवसांपासून हा प्रकार जास्तच वाढला असून दिवसातून आठ ते दहा विधी होत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रदुषण होत आहे. ज्या ठिकाणी हा विधी केला जातोय तेथील पाण्याला दुर्गंधी येत असून निर्माल्य, मृतांचे कपडे यांचा खच पडलेला आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत असल्याने स्थानिक ग्रामपंचायतीने संबंधित ठिकाणी फलक लावून असे विधी न करण्याचे आवाहन केले आहे,
परंतु त्याकडे दुर्लक्ष करुन हा गंभीर प्रकार सुरू आहे. लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याने पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन यांनी तातडीने हा प्रकार थांबवावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
हेच पाणी जातेय थेट पिण्यासाठी........ धरणाच्या कडेने दोन्ही बाजूंना ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत. अनेक ग्रामपंचायतींनी अजून जलशुद्धीकरण प्रकल्प किंवा प्रक्रिया प्रकल्प उभारलेले नाहीत. त्यामुळे हे दुषीत पाणी नळावाटे थेट नागरिकांच्या घरांमध्ये पिण्यासाठी जात आहे. याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे भविष्यात परिस्थिती गंभीर होण्याच्या अगोदर हा प्रकार थांबवणे आवश्यक आहे.
"आळंदी येथील अस्थी विसर्जन बंद करण्यात आल्यापासून मृतांचे नातेवाईक या ठिकाणी अस्थी,राख व इतर वस्तूंचे विसर्जन करत आहेत. आम्ही प्रत्यक्ष जाऊन हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु संबंधित लोक ऐकत नाहीत.
ग्रामपंचायतीने फलकही लावलेला असून त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. जवळच पाण्याची विहीर असल्याने ही घाण त्या पाण्यात जात आहे. हा केवळ आमच्या गावापुरताच नाही तर लाखो पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने संबंधित प्रशासनाने गांभीर्याने घेऊन कारवाई करणे आवश्यक आहे." सुरज पवळे, उपसरपंच, सोनापूर (ता. हवेली).
"सोनापूर गावच्या हद्दीत ज्या ठिकाणी हा विधी केला जातोय तेथे पाहणी करण्यासाठी कर्मचारी पाठविण्यात येतील. पोलीस प्रशासनाच्या मदतीने संबंधित ठिकाणी अस्थी विसर्जन करण्यासाठी येणारांवर कारवाई करण्याबाबत कार्यवाही केली जाईल." गिरिजा कल्याणकर, खडकवासला धरण शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग.
"खडकवासला धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने त्यामध्ये असे विधी करणे योग्य नाही. नागरिकांनीही जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. यापुढे संबंधित ठिकाणी कोणी अस्थी विसर्जन करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल." सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.