Pune Rains : पूरग्रस्तांचा मुक्काम अद्याप शाळेतच

Pune Rains : पूरग्रस्तांचा मुक्काम अद्याप शाळेतच

पुणे - अतिवृष्टीमुळे पुरात बेघर झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करून त्यांना घरे देण्याची घोषणा महापालिका प्रशासनाने केली होती. मात्र याबाबत आवश्‍यक ती कार्यवाही न झाल्याने आंबिल ओढा परिसरातील २५ कुटुंबांना अद्यापही महापालिकेच्या शाळेत राहावे लागत आहे. यामुळे पूरग्रस्तांची दिवाळी महापालिकेच्या शाळेत जाण्याची शक्‍यता आहे.  

गेल्या २५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीचा फटका सहकारनगर, कात्रज, धनकवडी, बालाजीनगर भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला होता. आंबिल ओढा परिसरातील (सर्व्हे क्र. १३४) काही घरे वाहून गेली, तर काहींची पडझड झाली, त्यामुळे या भागातील रहिवाशांचे महापालिकेच्या शाळांत स्थलांतर करण्यात आले होते. पूरस्थिती ओसरल्यानंतर या रहिवाशांना घरी सोडण्यात आले. मात्र पूर्णपणे घरे वाहून गेलेल्या २५ कुटुंबांतील नागरिकांची राहण्याची सोय महापालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज शाळेत करण्यात आली. त्यांचे लवकरच पुनर्वसन करण्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. 

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बैठक घेऊन पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पाहणी करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यात घरे वाहून गेलेल्या रहिवाशांकडील कागदपत्रे तपासून त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यामुळे घरे मिळण्याची आशा पूरग्रस्तांना होती; परंतु त्यानंतर याबाबत साधी चौकशीही झाली नसल्याने पुनर्वसन करणार, की शाळेतच मुक्काम ठेवणार, असा सवाल आता पूरग्रस्तांकडून उपस्थित केला जात आहे.

नगरसेवक धीरज घाटे म्हणाले, ‘‘पूरग्रस्तांना महापालिकेच्या मिळकतीत घरे देण्याबाबत चर्चा झाली आहे. मात्र याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगून पुनर्वसन केले नाही. महापालिकेच्या मिळकतीत असलेली मोकळी घरे  पूरग्रस्तांना देणे शक्‍य आहे.’’ 

दरम्यान, पूरग्रस्तांचे महापालिकेच्या मिळकतींमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे, त्यासाठी घरांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

पावसामुळे पूरग्रस्त  भागात घबराट
पुरात पडझड झालेल्या ७६ घरांमध्ये रहिवासी असुरक्षितपणे राहात असून महापालिका प्रशासनाचे त्यांच्या पुनर्वसनाकडेही दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शहरात पुन्हा संततधार पाऊस पडत असल्याने आंबिल ओढा परिसर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

‘एसआरए’ योजनेतील घरे देण्याची मागणी
शहराच्या विविध भागांत झोपडपट्टी पुनर्वसन विकास योजना (एसआरए) आणि गरीब घटकांसाठी (बीएसयूपी) घरे आहेत. या ठिकाणी पूरग्रस्तांचे पुनर्वसन करता येईल, अशी भूमिका घेऊन महापालिकेने हालचाली सुरू केल्या होत्या. या योजनांमधील किमान पाच हजार घरे बंद स्थितीत आहेत, त्यातील घरे देण्याची मागणी पूरग्रस्तांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com