‘सेकंड इनिंग्ज’ ठरतेय ज्येष्ठांसाठी गुंतागुंतीची

‘सेकंड इनिंग्ज’ ठरतेय ज्येष्ठांसाठी गुंतागुंतीची

पुणे - आयुष्याच्या उतारवयात जोडीदार सोडून गेल्याने मानसिक आधारासाठी, सेवा-सुश्रुषेसाठी ज्येष्ठ नागरिकांकडून पुन्हा एकदा रेशीमगाठी जुळविल्या जात आहेत. या रेशीमगाठी लग्नापुरत्याच मर्यादित न राहता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारख्या नव्या पर्यायापर्यंतही पोचल्या आहेत. एकीकडे वृद्धांच्या या धाडसी ‘सेकेंड  इनिंग्ज’मुळे त्यांचे आयुष्य सुकर व्हायला मदत होत असताना या नव्या नात्यामुळे कुटुंबामध्ये गुंतागुंतीच्या समस्या तयार होत आहे. या समस्या सोडविण्यासाठी ज्येष्ठांना पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे. 

पत्नीच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या सधन कुटुंबातील ६४ वर्षीय ज्येष्ठाने ओळखीच्या एका महिलेशी लग्न केले. 

त्यांच्या या निर्णयाबद्दल कुटुंबाबरोबरच नातेवाईक, मित्र-मंडळींना आश्‍चर्याचा धक्का बसला. त्यांच्या आयुष्याची काही काळ विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसू लागली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत पत्नी नाही, मुले परदेशात. मुबलक पैसा असूनही जेवण, औषधांची तारांबळ होत असल्यामुळे एका ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकाराने ६८ वर्षांच्या व्यक्तीचे लग्न झाले. एका नागरिकाने लग्नाऐवजी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा पर्याय निवडून त्यानुसार स्वत-चे आयुष्य जगण्यास सुरवात केली. अशी वेगवेगळी उदाहरणे आपल्या अवती भवती दिसू लागली आहेत.

एकाकी जगण्यापेक्षा चांगल्या साथीदाराबरोबर उतारवयातील आयुष्य घालविण्यास वृद्धांकडून प्राधान्य दिले जात आहे. दुसरे लग्न करणाऱ्या काही वृद्धांच्या कुटुंबीयांकडून या निर्णयाचे स्वागत केले जाते, तर दुसरीकडे काही कुटुंबांमध्ये या नव्या नात्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्‍नांमुळे अस्वस्थता निर्माण होत आहे. काही कुटुंबातील मुलांकडून नवे नाते स्वीकारले जात नसल्याने, ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाकडे धाव घ्यावी लागत आहे.

एकाकी वृद्धांची आम्ही लग्ने लावली आहेत. या नव्या नात्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये आर्थिक, मालमत्ता व त्यांचा सांभाळ करायचा कोणी, यावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पोलिसांकडे अशा स्वरूपाच्या तक्रारी दाखल आहेत.
- अरुण रोडे, राज्य अध्यक्ष, फेस्कॉम

उतारवयात एका साथीदाराचे निधन झाल्याने आणि मुले सोडून गेल्यामुळे दुसऱ्या साथीदाराचे जगणे उद्‌ध्वस्त होते. मी स्वत- एकाकी जीवन जगणाऱ्या सहा जणांची लग्ने लावली आहेत. समाज काय म्हणेल, यापेक्षा त्यांचे जीवन सुकर होण्याला महत्त्व आहे.
- दशरथ भालेराव,  ज्येष्ठ नागरिक संघ.

ज्येष्ठ नागरिक दुसरे लग्न करून आधार मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र काही प्रकरणांमध्ये नव्या व्यक्तीचे घरात येण्यामुळे अनेक गुंतागुंतीचे प्रश्‍न निर्माण झाले आहे. ते प्रश्‍न सोडवायचे कसे, या प्रश्‍नाचे उत्तर त्यांचे कुटुंबीय शोधत आहेत.
- स्वाती थोरात,  पोलिस निरीक्षक, ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष.

नातेसंबंधातील प्रश्‍नही वाढले 
वृद्ध नागरिकांकडून दुसरे लग्न करण्याच्या प्रयत्नांमुळे कौटुंबिक समस्याही निर्माण होत आहेत. त्याला/तिला स्वीकारायचे कसे? वयातील अंतरामुळे काय म्हणायचे? त्यांच्यानंतर त्याचा/तिचा सांभाळ कोण व कसा करणार? मालमत्तेचा हक्क मागितला तर? या प्रश्‍नांबरोबरच दोन्ही कुटुंबात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com