लॉकडाउनमुळे अडकलेले बिहार, यूपीचे तरुण महाराष्ट्राविषयी म्हणतायेत... 

mob
mob

शिक्रापूर (पुणे) : शिथिल लॉकडाऊन आणि उद्योग बऱ्यापैकी सुरू होण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांचा परप्रांतीय कामगारांवर चांगलाच परिणाम झाल्याचा दिसत आहे. कारण, जे कामगार आपापल्या गावी अद्यापही गेलेले नाहीत, त्यांच्या प्रतिक्रिया अशाच आहेत. ते म्हणतात की, ""महाराष्ट्रही अच्छा है, गॉंव जाकर क्‍या करेंगे? कोरोना तो कभी ना कभी ठीक हो जानेवाला है, उसके लिये गॉंव जाकर वापस क्‍यू आऊं, यहॉंही रहेंगे..!'' 

तिसऱ्या लॉकडाउनमध्ये राज्यातील अनेक शहरे, उपनगरे आणि औद्योगिक पट्ट्यातील अनेक गावांमध्ये उद्योगधंदे सुरू होण्याच्या दृष्टीने सरकार, उद्योजक आणि व्यावसायिक यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, आपापल्या गावी जाण्यासाठीची परप्रांतीय कामगार- मजूर व त्यांच्या कुटुंबांची लगीनघाई महाराष्ट्राच्या उद्योगविश्‍वासाठी धोक्‍याची घंटा आहे. मात्र, हे चित्र तात्कालिक असल्याचे चित्रही नुकतेच अनेक ठिकाणी अनुभवायला आले. कारण, रांजणगाव (ता. शिरूर) येथील काही परप्रांतियांशी आवर्जून संवाद साधल्यावर त्यांनी ज्या बोलक्‍या प्रतिक्रिया दिल्या. त्या खरोखरीच महाराष्ट्र म्हणून आपली प्रत्येकाची मान उंच होईल, परप्रांतीय मंडळी इथेच राहतील, मोठ्या संख्येने परत येतील, अशी आशा बाळगावी अशाच होत्या. 

एवढा कठीण काळ असूनही रांजणगावातच एका खोलीत राहणाऱ्या राजू राजपूत या राजस्थानमधील युवकाने सांगितले की, आम्ही सहा मित्र एक वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात आलो. इथे गेल्या वर्षभरात जे काही कमावले, त्यावर आमच्या गावाकडील दहा कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न मिटला आहे. येथे राहणे सुरक्षित आहे. काम मिळेल, याची हमखास शाश्‍वती आहे आणि विशेष म्हणजे, येथे जेवढे काम कराल, तेवढे उत्पन्न मिळण्याची शाश्वती आहे. त्यामुळे एवढ्या कोरोनाच्या काळातही घरून सर्वांना सारखे बोलाविले जातेय. मात्र, आम्ही कुणीही जाणार नसून, कोरोना संपला की, उलट आणखी पंधरा मित्रांना इकडे आम्ही बोलावणार आहोत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, सणसवाडी- शिक्रापूर परिसरातील काही परप्रांतीयांची भेट घेतली असता त्यातील सुरतसिंग बर्नाला, निशिकांत कुबाटा, रोहित कुटेल, श्‍याम पटेल, मेहूल रुस्तोगी आदी आसाम, बिहार व उत्तर प्रदेशातील युवकांनी सांगितले की, लॉकडाउन झाल्यानंतर आम्ही शिक्रापूर- सणसवाडीत अक्षरश: अडकलोच. मात्र, इथल्या स्थानिकांनी आमची काळजी घेतली. शिक्रापुरात सुरेश भुजबळ व पोलिसांच्या मदतीने एक वेळ तयार जेवण देण्याची चांगली व्यवस्था झाली. त्यामुळे आम्ही खरोखरीच निर्धास्त राहिलो. त्यामुळे आमची बरीच मित्रमंडळी गावाकडे गेली. त्यातील अनेक जण परत येणार नाहीत, असे म्हणाले. पण, आम्हाला ठाऊक आहे की, आमच्या राज्यात रोजगार, सुरक्षितता आणि सामाजिक संवेदनशीलता म्हणून जी स्थिती आहे, ती इतकी भयंकर आहे की, आम्हाला आता महाराष्ट्रासारखे सुरक्षित कुठेच वाटत नाही. पर्यायाने लॉकडाउन उठल्यावर गेलेल्यांपेक्षा जास्त संख्येने आमचे बांधव परत महाराष्ट्रात येतील. कारण, तसे फोनही आता सुरू झालेत. 

हा महाराष्ट्राचा गौरव... 
या संपूर्ण औद्योगिक परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असलेले व त्यावर सोशल मिडीयातून आपले विचार सातत्याने मांडणारे ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे यांनी सांगितले की, चाकण, रांजणगाव, कुरकुंभ आदी भागातील परप्रांतीयांना महाराष्ट्राबद्दल विश्वास द्यायला प्रशासन कमी पडलेले आहे. अर्थात त्यांच्या राज्यात रोजगार नाहीत म्हणूनच ते इथे येतात. गेल्या काही दिवसात जे आपापल्या प्रांतात गेले त्यांना प्रशासनाने विश्वास दिला असता, तर त्यातील अनेक जण इथेच राहिले असते. मात्र, आता जे आहेत ते महाराष्ट्रावर विश्वास व्यक्त करून कामाला लागत आहेत. अशातच महाराष्ट्रातील तरुणांनाही चांगली रोजगार संधी असून ती दवडू नये. यासाठी असे रोजगार व महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी आम्ही सर्व समाजवादी चळवतीतील कार्यकर्ते कामाला लागलो आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com