पुणे - जातींतील अस्पृश्यता निवारण्यासाठीचे प्रयोग मी पत्रकारितेतून केले. पत्रकारांनी मनात आणले तर बदल घडू शकतो. मनुष्याच्या स्वभावात सुधारणा झाल्यावर बदल निश्चितच होतो. म्हणूनच समाजातील बदलत्या वास्तवाचे आकलन नव्या पिढीतील पत्रकारांनी करावे, असा सल्ला ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांनी दिला.
जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने मनोविकास प्रकाशनतर्फे आयोजित कार्यक्रमात कांबळे यांची ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे आणि प्रकाशक अरविंद पाटकर यांनी मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते. कर्नाटकातील आपले मूळ गाव शिरगुप्पी येथून ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास त्यांनी मुलाखतीतून उलगडला. लेखिका इंदुमती जोंधळे यांच्या हस्ते कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
कांबळे म्हणाले, ‘‘पत्रकाराची अक्षरे समाजात सलोखा निर्माण करू शकतात. साहित्याचे व पत्रकारितेचे मूळ ध्येय मुळात सामाजिक बदल व समाजाला मदत हे होय. पत्रकारितेचा उद्देशच मुळी समाजविकास हा आहे. मी पत्रकारितेला सुरवात केली तेव्हा महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात जातीयता गडद होती. जगण्याच्या लढाईतच मी सामाजिक चळवळीकडेही वळलो. भटक्यांच्या, देवदासींच्या प्रश्नांना वाचा फोडली.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.