जुन्नर : कल्याण-नगर मार्गावरील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माळशेज घाटात वर्षा विहारासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता अबाधित राहावी, जीवितहानी होऊ नये यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी 31 जुलैपर्यंत या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला असून या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
या आदेशानुसार आता घाटात धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात रस्त्यावर अथवा धोकादायक ठिकाणी पर्यटकांना आपली वाहने उभी करता येणार नाहीत. धबधब्यावर जाणे अथवा त्याखाली बसणे यास देखील प्रतिबंध करण्यात आला आहे. मद्य जवळ बाळगणे, वाहतूक करणे, मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या तसेच महिलांची टिंगल टवाळी, छेडछाड करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.
धबधबे,दऱ्याचे कठडे तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे चित्रीकरण करणे यास प्रतिबंध आहे. ध्वनी, वायू व जल प्रदूषण करणाऱ्या विरुद्ध कारवाई केली जाणार आहे. सांयकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत धबधबे,तलाव,धरणे येथील पाण्यात उतरण्यास प्रतिबंध करण्यात आहे.
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाची 10 जुलै पासून घाटात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. अशाच प्रकारे जुन्नर तालुक्यातील नाणेघाट, दाऱ्याघाट येथे प्रतिबंधात्मक आदेशाची आवश्यकता आहे. जुन्नर पोलिसांनी देखील आवश्यक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे नागरिकांची मागणी आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.