‘पंच’नामा : माझं कुटुंब, ‘किंबुहना’ माझी जबाबदारी

‘कोरोनापासून वाचण्यासाठी आपण सोशल डिस्टन्स पाळायला हवे. पाळलेच पाहिजे ! का नाही पाळायचे? किंबहुना प्रत्येकाने ते पाळलेच पाहिजे.
Panchnama
PanchnamaSakal Media

पुणे : रोज टीव्हीवरील बातम्या बघून आमची भाषाच बदलू लागली आहे. आधी आम्ही सरळ आणि स्पष्ट बोलायचो. मात्र, हल्ली अनेकांनी आमची भाषा समजत नसल्याची तक्रार केली आहे. ‘फिरून फिरून पुन्हा भोपळे चौकात’ असं आमचं बोलणं आहे, असं काहींचं म्हणणं आहे. आता सकाळीच गोष्ट. बायकोने दुकानातून मिठाचा पुडा आणायला सांगितला. त्यावर आम्ही म्हणालो, ‘‘आणलाच पाहिजे. न आणून कसं जमेल? नक्की आणणार. आणणार म्हणजे काय आणणारच. किंबुहना मी तर म्हणतो आणलाच पाहिजे. अन्नाला मीठाशिवाय चव नाही. कशी असेल? नसणारच. किंबहुना चवीसाठी मीठ हवेच. त्यासाठी मला दुकानात गेलेच पाहिजे. आपण नाही गेलो तर मीठ काय आपोआप घरी येणार आहे का? नाही येणार. कसे येईल? किंबहुना मीठाला काय पाय फुटणार आहेत का? त्यासाठी आम्हाला दुकानात गेलंच पाहिजे. किंबहुना मीठ आणणं, ही आमची जबाबदारी आहे.’’

आम्ही बोलत होतोच. तेवढ्यात बायको दुकानातून मिठाचा पुडा घेऊन आलीसुद्धा. बोलून बोलून घशाला कोरड पडल्याने आम्ही आवाज दिला.‘‘किंबहुना, पाणी आण.’’ गेल्या काही महिन्यांपासून आम्ही आमच्या वरूण बाळाचे नाव ‘किंबहुना’ असे ठेवलंय. किंबहुनाने पाणी दिल्यानंतर त्याला लॉकडाउनचे महत्त्व सांगत बसलो. माझ्या महाराष्ट्रासाठी ‘ब्रेक द चेन’ कशी महत्त्वाची आहे, हे त्याला तासभर पटवून दिले. ‘‘बाबा, मी तुमच्याकडे कधीच कसलाही हट्ट धरणार नाही पण तुम्ही मला कधीच गोंधळात टाकणार नाही, याचे वचन द्या.’’ यावर आम्ही गप्प बसलो. थोड्यावेळाने आम्ही बाहेर पडलो. किराणा मालाच्या दुकानात गेलो. आज रात्री आठपासून संचारबंदी लागू होणार असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आम्ही लगेचच दुकानदाराशी संवाद साधला.

Panchnama
रेमडेसिव्हिरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

‘कोरोनापासून वाचण्यासाठी आपण सोशल डिस्टन्स पाळायला हवे. पाळलेच पाहिजे ! का नाही पाळायचे? किंबहुना प्रत्येकाने ते पाळलेच पाहिजे. एकवेळ कुत्रा-मांजर पाळू नका. पण सोशल डिस्टन्स पाळा. आपल्या देशासाठी, राज्यासाठी, मानवजातीसाठी ते आवश्‍यक आहे. नव्हे नव्हे ती आपली जबाबदारी आहे.’’ माझ्या या बोलण्याचा परिणाम एवढाच झाला, की एवढ्या गर्दीतही दुकानदाराने पुढे येत, ‘‘साहेब, आपल्याला काय हवंय’’? असं अदबीनं विचारलं. दुकानदार एवढा नम्र झाल्याचे पाहून आम्ही सद्‍गदित झालो. लॉकडाउनच्या काळात दुकानदारांनी ग्राहकांशी नम्रतेने वागावे, असा सरकारने ‘जीआर’ काढला आहे का, अशी शंका आमच्या मनी आली.

‘‘आम्हाला मिठाचा पुडा द्या. द्या म्हणजे काय? दिलाच पाहिजे. किंबहुना आम्ही न मागताही तुम्ही आम्हाला मिठाचा पुडा दिला पाहिजे....’’ आम्हाला बराचवेळ बोलायचं होतं पण दुकानदाराने मिठाचा पुडा हातात ठेवत, एक पैसाही न घेता आम्हाला हाताला धरून दुकानाबाहेर आणलं. घरी आल्यानंतर मिठाचा पुडा पाहून बायकोने कपाळावर हात मारला. ‘‘अहो, मी पुडा आणला होता...’’ आम्ही बोलायला तोंड उघडणार, तोच ती किचनमध्ये पळाली व तिने आमच्या हाती चहा ठेवला व म्हणाली, ‘‘अहो, तुमची तब्येत बरी दिसत नाही. तुम्ही आराम करता का?’’ असे म्हणाली.

‘‘म्हणजे काय? आराम केलाच पाहिजे. न करून कसे चालेल. किंबहुना आराम हवाच,’ असे आम्ही म्हणालो. थोड्यावेळाने आम्ही झोपी गेलो. मात्र, झोपेतही आम्ही ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ असं सारखं बडबडत होतो.

Panchnama
सावधान! कोरोनाबाधितांनी ओलांडला दोन लाखांचा टप्पा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com