पुणे- पुरामुळे अवघा संसार वाहून गेलेल्या हजारो कुटुंबीयांना सावरण्यासाठी मदतीचे हात आता पुढे येऊ लागले आहेत. ‘सकाळ’ने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन, शनिवारी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे राज्यभरातून सुमारे दहा लाख रुपयांची मदत जमा झाली.
लहानग्यांनी आपल्या खाऊचे पैसे घेऊन ‘सकाळ’ कार्यालय गाठले; तर विविध संस्था-संघटनांनी पुरात अडकलेल्या बांधवांना तत्काळ मदत व्हावी, या हेतूने आपल्या कष्टांची पुंजी आज ‘सकाळ’कडे खुली केली.
कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत जलप्रलयाने थैमान घातले आहे. कोल्हापूर आणि सांगली ही शहरे आजही पाण्याच्या विळख्यात अडकली आहेत. त्यात हजारो संसार उघड्यावर आले असून, मालमत्तेची अगणित हानी झाली आहे.
संकटात सापडलेल्या या बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी एका बाजूला शासकीय यंत्रणा काम करीत आहे. पण आभाळ एवढे फाटले आहे, ते शिवण्यासाठी मदतीचे लाखो हात लागणार आहेत. याच भावनेतून ‘सकाळ रिलीफ फंडाने’ पूरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत जाहीर केली असून, समाजातील दानशूरांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यास पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, पुण्यातील विविध संस्था, गणेश मंडळे, कामगार आणि इतर संघटना, व्यापारी, कंपन्या, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांनी आपली मदत योग्य ठिकाणी पोहोचावी यासाठी ‘सकाळ’कडे धनादेश तसेच रोख रक्कम आज सुपूर्त केली.
पूरग्रस्तांसाठी औषधे, धान्य, ब्लॅंकेट्स, शैक्षणिक साहित्य आदींची आवश्यकता आहे. हे साहित्य देण्यासाठी खालील नंबरशी संपर्क साधावा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.