विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळांकडून होते अडवणूक

RTE
RTE

पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवर प्रत्यक्ष प्रवेश देण्याऐवजी आता कागदपत्रांतील किरकोळ त्रुटींचे कारण पुढे करून पालकांना हेलपाटे मारण्यास शाळा भाग पाडत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष शाळा प्रवेश लांबणीवर पडत असून, हे विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून दुरावले जात आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी मार्चमध्ये पहिली सोडत निघाली. मात्र, त्यानंतर लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी या प्रक्रियेला दिलेली स्थगिती उठविण्यात आली. पहिल्या सोडतीप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तारखा देण्याचे आदेश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. ही प्रक्रिया पुन्हा सुरू होऊन, काही दिवस उलटले तरी अद्याप शाळा पालकांना प्रवेशासाठी बोलवत नसल्याचे दिसून येते. तसेच प्रवेशासाठी बोलाविल्यास किरकोळ त्रुटी काढून पालकांची अडवणूक करत आहेत.

प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पडताळणी करताना शुद्धलेखनातील किरकोळ चुका किंवा छपाईतील किरकोळ त्रुटी हे मुद्दे पुढे करून शाळा पालकांना शिक्षण विभागाकडे दुरुस्ती करून आणण्यासाठी पाठवत आहेत. सध्या अनलॉक असले तरी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भेट होत नसल्याने पालकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. धायरीतील योगेश पोटे यांचा अनुभव असाच आहे. ते म्हणाले,‘‘शाळेकडून मुलाच्या प्रवेशासाठी संदेश आला आणि त्याप्रमाणे शाळेतही गेलो. प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रे जमा केली. परंतु ॲडमिट कार्डमध्ये नाव चुकल्यामुळे ते शिक्षण विभागाकडून दुरुस्त करून आणण्यास सांगितले आहे. मात्र ऑनलाईनवर आता कोणत्याही प्रकारे माहिती दुरुस्त होत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.’’

पालकांना दिला पुरेसा अवधी
‘आरटीई’ २५ टक्के प्रवेशाबाबत आतापर्यंत राज्यातील जवळपास दोन हजार ४१० विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जात नमूद केलेल्या मोबाईलवर मेसेज पाठविण्यात आले आहेत. मात्र, आतापर्यंत किती प्रवेश झाले, याबाबत अद्याप माहिती संकलित झालेली नाही, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप यांनी दिली. प्रवेशादरम्यान येणाऱ्या किरकोळ त्रुटींबाबत विचारले असता, ते म्हणाले, की प्रवेश अर्जातील चुका दुरुस्त करण्यासाठी पालकांना पुरेसा अवधी यापूर्वी देण्यात आला होता.

कागदपत्रातील किरकोळ त्रुटींसाठी पालकांना परत पाठविणे चुकीचे आहे. नियमाप्रमाणे कागदपत्रे आणि हमीपत्र घेऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश द्यावा. कागदपत्रात गंभीर चूक असल्यास अंतिम पडताळणीत कागदपत्रे नाकारली जाणार असून, मुलांचे प्रवेशही रद्द होतील. या प्रक्रियेत शाळांवर कोणतीही जबाबदारी नाही. त्यामुळे शाळांनी पहिल्या टप्प्यात प्रवेश द्यावेत. अंतिम पडताळणीचे काम स्वतःवर घेऊ नये.
- सुरेखा खरे, अध्यक्ष, २५ टक्के आरक्षण पालक संघ, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com