पुणे : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शाळा-महाविद्यालये येत्या १४ मार्चनंतरही बंदच ठेवण्यात येतील. दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत तयारी करावी लागणार आहे. तसेच, वाढती रुग्णसंख्या पाहता निर्बंध लावण्याबाबत शुक्रवारी (ता. १२) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीत अंतिम निर्णय घेणार येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत विभागीय आयुक्त राव यांच्या उपस्थितीत शुक्रवारी विधान भवन येथे आढावा बैठक झाली. या बैठकीत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संस्थांकडून पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत शास्त्रोक्त विश्लेषण करण्यात आले आहे. या संदर्भात राव म्हणाले, ‘‘सध्या शाळा-महाविद्यालये १४ मार्चपर्यंत बंदच आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यामागे शाळा-महाविद्यालये हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे आयसर आणि टीसीएस या संस्थांनी शाळा-महाविद्यालये १४ मार्चनंतरही बंद ठेवावीत, अशी स्पष्ट शिफारस केली आहे. शाळा-महाविद्यालये बंद ठेवल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना फारसा त्रास होणार नाही. परंतु दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत प्रशासनाची तयारी आहे.’’
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
''हॉटेल, रेस्टॉरंट, बिअर बार बंद करून केवळ पार्सल सेवा सुरू ठेवणे, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने, चित्रपटगृहे, मॉल, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री बंद ठेवणे या पर्यायांची अंमलबजावणी केल्यास रुग्णसंख्येत किती घट होईल, याचेही विश्लेषण अहवालात केले आहे. त्यावर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल.''
- सौरभ राव, विभागीय आयुक्त
बैठकीत काय ठरले?
- १४ मार्चनंतरही शाळा-महाविद्यालये बंदच
- दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्याची प्रशासनाची तयारी
- आयसर आणि टीसीएस या संस्थांकडून पाहणी अहवाल सादर
- उपमुख्यमंत्री अजित पवार अंतिम निर्णय घेणार
- पुण्यातील धक्कादायक घटना; आईला मारहाण करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
अभ्यास करून नियोजन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूची संख्येची नोंद गुरुवारी झाली. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात दररोज अठराशे ते दोन हजार रुग्ण आढळून येत होते. त्यावेळी रुग्णांची संख्या, ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटरची गरज, बाधित रुग्णांचे मृत्यू या बाबींचे विश्लेषण करण्यात येणार आहे. त्याची तुलना सध्याच्या परिस्थितीशी करण्यास आयसर आणि टीसीएस यांना सांगण्यात आले आहे. त्याचा अहवाल दहा मार्चला प्राप्त होणार आहे. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर ठोस नियोजन करणे शक्य होईल, असे सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
‘हर्ड इम्युनिटी’ क्षेत्रात रुग्णवाढ
पुणे महापालिकेच्या काही प्रभागात ‘सिरो’ सर्वेक्षण करण्यात आले होते. तेथील नागरिकांमध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) तयार झाल्याचे समोर आले होते. त्या परिसरातही पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामागील कारणमीमांसा आयसर आणि टीसीएस या संस्थांनी केली आहे, असे सौरभ राव यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.