किरकटवाडी - सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेल्या जमिनीचा कोणताही मोबदला किंवा पुनर्वसन झाले नसल्याने खडकवासला येथील भूमिपुत्र रायकर कुटुंबाला रस्त्यावर येऊन कुटुंबाचा गाडा हाकावा लागत आहे. धरणाच्या चौपाटीवर हातगाडीवर भजी, वडापाव, चहा विकून जीवन जगावे लागत आहे. त्यातही त्यांच्या दुसऱ्या एका जागेवर एका ‘बड्या’ राजकीय नेत्यांचा डोळा आहे. त्यालाही हे कुटुंब न जुमानता झटत आहे.
शंकर रायकर यांचे वडील नारायण बारसू रायकर हे पाटबंधारे विभागात नोकरी करत होते. धरणाच्या खालच्या बाजूला शंकर नारायण रायकर यांची सुमारे ५ एकर वडिलोपार्जित जमीन होती. १९७१ मध्ये ती सार्वजनिक बांधकाम विभागाने ताब्यात घेतली आहे. या जमिनीचा रायकर कुटुंबाला आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही आणि इतरत्र कोठेही पुनर्वसन झालेले नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या परिवाराचे पोट भरायचे कसे? असा प्रश्न नारायण यांना भेडसावू लागला. त्यांनी पाटबंधारे विभागाकडून रीतसर अर्ज करून खडकवासला धरणाच्या पश्चिमेकडील केंद्रीय विद्यालयाजवळील गाळपेर जमीन कसण्यासाठी मिळवली. या जमिनीचा खंड व पाणीपट्टी रायकर परिवार नियमितपणे भरत आलेला आहे; परंतु सध्या कसत असलेल्या जमिनीवरूही बळाचा वापर करून प्रशासनाने शंकर रायकर व त्यांच्या परिवाराला कित्येक वेळा हाकलण्याचा प्रयत्न केला.
शंकर रायकर व त्यांची पत्नी पार्वती रायकर व मुले नवनाथ व मच्छिंद्रनाथ धरणाच्या चौपाटीवर चहा, वडापाव, भजी, भाजलेले मक्याचे कणीस आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उसाचा रस विकून आपले पोट भरत आहे.
घरातील मुला-मुलींचे शिक्षणही याच व्यवसायातून मिळालेल्या पैशांवर केले जात असल्याची माहिती पार्वती रायकर यांनी दिली. खडकवासला धरणाचे शाखा अभियंता राजकुमार क्षीरसागर यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा दूरध्वनी बंद असल्याने तो होऊ शकला नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.