Rohit Pawar : शरद पवार यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून पवार कुटुंबीयांचा वापर

भाजप आमच्या जवळच्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार यांच्यावर निशाणा धरत आहे.
Rohit Pawar
Rohit Pawarsakal

पुणे - 'भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला शरद पवारांची कारकीर्द संपवायची आहे, असे बोलून दाखवले आहे. त्यामुळे भाजप आमच्या जवळच्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार यांच्यावर निशाणा धरत आहे.

पवार कुटुंबातील लोकांचा वापर करून भाजप पवार यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात आहे.

जनता पवार साहेबांबरोबर असल्याने सुप्रिया सुळे या तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी बारामतीमधून निवडून येतील.' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी सोमवारी भाजपवर टीका केली.

आमदार पवार यांनी पत्रकार भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघ, राज्यातील अन्य मतदारसंघ, पक्षाची तयारी अशा विविध विषयांवरील प्रश्‍नांना उत्तरे दिली. रावेर, सातारा, माढा, सातारा मतदारसंघातील सद्यःस्थितीबाबत पवार म्हणाले, 'माढा मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांना संधी देण्याची चर्चा होती. ते मोठे नेते असून माढ्यातून उभे राहिले असते तर त्यांचा विजय झाला असता.

त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने जानकर यांना परभणीतून तिकीट दिले असे म्हटले जाते, प्रत्यक्षात ते भाजपने तिकीट दिले आहे. तिथे त्यांचे नुकसान होईल. भाजपने जानकरांची ताकद कमी केली, आताही ते जानकर यांना संपवत आहेत. साताऱ्यात श्रीनिवास पाटील आजारी असल्याने दुसरा सक्षम उमेदवार दिला जाईल. 31 मार्चला घोषणा होईल.'

कसबा पोटनिवडणुकीत गुंडांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. तरीही धंगेकर निवडून आले. आताही गुंड मोठ्या नेत्यांना भेटत आहेत. गुंडांना राजकीय वरदहस्त आहे. पोलिसही त्यांचे काही करू शकत नाहीत. नीलेश घायवळ या गुंडाला पुणे पोलिसांनी बोलावले होते. त्यानंतरही त्याने रिल काढून समाजमाध्यमांमध्ये फिरवली. पुण्यात, महाराष्ट्रात गुंडांची दहशत वाढत असूनही पोलिस आयुक्त काहीही करत नाही. पैसा, गुंडांचा वापर करून लोकशाही संपविण्याचा प्रयत्न भाजप व त्यांचे इतर पक्ष करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

विकासासाठी तुम्ही ब्रिटीशांबरोबर गेला असता का?

'अजित पवार हा कामाचा माणूस आहे' अशी बारामतीमध्ये चर्चा सुरु आहे, याबाबत रोहित पवार यांना प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावेळी पवार म्हणाले, 'शरद पवार यांची, त्यांच्या विचारांची साथ सोडली तर उद्या तुम्ही सामान्य लोकांची साथ सोडून भ्रष्टाचाराचा मार्गावरही जाऊ शकता. मग विकासाचे नाव पुढे करून स्वतःचे घर भरणे कितपत योग्य आहे.

मी फक्त अजित पवार यांच्याबद्दल बोलत नाही, तर विविध प्रकारचे आरोप असणारे इतर नेत्यांवरील आरोपांचे, सीबीआय, इडी चौकशीचे काय झाले? ब्रिटिश काळात विकास झाला, मग ब्रिटिश किती ताकदवान आहेत, त्यांनी किती विकास केला, अनेक देशात त्यांची सत्ता आहे. मग सामान्य लोकांची साथ सोडून तुम्ही त्यावेळी ब्रिटीशांबरोबर गेला असता का? ही ब्रिटिश वृत्ती स्वीकारणार आहोत का? आज विचारांची लढाई आहे, ती विचारांनी लढली पाहिजे. बारामती, पुणे जिल्ह्यात आयटी कंपन्या, एमआयडीसी, धरणे पवारांनीच उभारली आहेत''

तटकरे सिंचनाच्या चिखलात अडकलेले नेते

'मी लहान असल्याने सुनील तटकरे मला बालवाडीचे अध्यक्ष म्हणत असतील. पण ते सिंचनाच्या चिखलात अडकलेले नेते आहेत. त्या चिखलातून बाहेर निघण्याची बुद्धी त्यांच्याकडे नक्की आहे. एका घराच्या पत्त्यावर शंभर कंपन्या कशा? भाजपबरोबर जाऊन स्वतःवरील कारवाया थांबवायच्या, हे त्यांनी केले.

तटकरे यांनी अंतुले, जयंत पाटील, देशमुख यांना सोडले. शरद पवार यांना सोडले, आज दादांबरोबर असले तरी उद्या भाजपमध्ये जाणारेही तेच पहिले नेते असतील, विचार व पक्ष सोडण्याची त्यांच्या इतकी बुद्धी मला नक्कीच नाही,' अशी खोचक टीका पवार यांनी तटकरे यांच्यावर केली.

पवार म्हणाले,

- भ्रष्टाचाराचा आरोप असलेले भरपूर शिकलले

- शिक्षणापेक्षा लोकांचे प्रतिनिधित्व करणे महत्त्वाचे, धंगेकर योग्य उमेदवार

- प्रकाश आंबेडकर मोठे नेते, संविधान वाचवण्यासाठी ते चांगला विचार करतील

- आंबेडकरांनी उमेदवार उभे केल्यास महाविकास आघाडीला फटका, तर भाजपला फायदा होईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com