WaterCrisis : पुणेकरांच्या पाण्यावर नगरसेवकांचा 25 कोटींचा डल्ला

WaterCrisis : पुणेकरांच्या पाण्यावर नगरसेवकांचा 25 कोटींचा डल्ला

पुणे -  पाणीटंचाईने पुणेकर हैराण झाले असतानाच त्यांना शुद्ध पाणीपुरवठ्याच्या २,३०० कोटी रुपयांच्या समान पाणीपुरवठा योजनेतून नगरसेवक आपले हात ओले नव्हे, तर धुऊनच घेत आहेत. या योजनेच्या मंजुरीसाठी आटापिटा केलेल्या सत्ताधारी भाजपसह अन्य पक्षांच्या २२ नगरसेवकांनी आपापल्या भागांतील जलवाहिन्यांच्या खोदाईसाठी ठेकेदारांकडे भरमसाट पैसे मागत ही कामे रोखली आहेत. नगरसेवकांच्या धाकदपटशाहीमुळे ठेकेदारानेही काम थांबविले असून, परिणामी योजनेतील १६०० पैकी केवळ २५ किलोमीटरच खोदाई झाली आहे. 

ही योजना मंजूर करण्यापासून तिचे काम ठरावीक कंपन्यांच्या पदरात पाडण्यासाठी सत्ताधारी भाजप नेत्यांनी प्रयत्न केले होते. ही योजना पुणेकरांकरिता उपयुक्त ठरेल, हे पटवून देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही योजनेच्या मंजुरीसाठी विशेष लक्ष घातले होते. परंतु, आता भाजपचेच नगरसेवक योजनेत अडथळे आणत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. कोथरूड, मार्केट यार्ड, विमाननगर, नगर रस्ता या भागांतील भाजप आणि विरोधी पक्षांच्या काही नगरसेवकांनी खोदाईसाठी सुमारे प्रत्येकी किमान २० लाख रुपयांची मागणी केल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आल्या आहेत. हा आकडा २५ कोटींपर्यंत असल्याचे सांगण्यात आले. ही बाब महापौर आणि अन्य नेत्यांच्या कानावर गेली; मात्र एकाही पदाधिकाऱ्याने पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

मागील वर्षी फेब्रुवारी २०१८ मध्ये योजनेच्या निविदा मंजूर झाल्या. मार्च २०१८ मध्ये ठेकेदारांना कामाचा आदेश देण्यात आला. त्यानंतर जानेवारी २०१९ पासून जलवाहिनीसाठी प्रत्यक्ष खोदाईला प्रारंभ झाला. गेल्या चार महिन्यांत सुमारे १२० किलोमीटर लांबीची खोदाई करून जलवाहिन्यांची बांधणी अपेक्षित होती. परंतु, खोदाईचे काम सुरू होताच नगरसेवकांनी ठेकेदाराला गाठून पैशांची मागणी केली. एवढे पैसे देण्यास ठेकेदार कंपनीने नकार दिला. पैसे मिळेपर्यंत कामच करू देणार नसल्याची भूमिका नगरसेवकांनी घेतल्याने खोदाईसाठी आणलेले साहित्य ठेकेदाराने परत नेल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, ‘शहरात योजनेसाठी २५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांसाठी खोदाई झाली आहे,’ असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.


पाणीटंचाईने पुणेकर हैराण 
शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई आहे, त्यामुळे पुणेकरांचे आतोनात हाल होत आहेत. लोकांना पाणी मिळत नसल्याचा गळा नगरसेवक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काढतात. दुसरीकडे पुणेकरांच्या पाण्यातूनही ते पाण्यासारखा पैसा उपसण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या तक्रारी होत आहेत.

योजनेच्या कामात कोणत्याही अडचणी नाहीत. ती रोखल्याच्या तक्रारी असतील तर त्याबाबत चौकशी केली जाईल. परंतु, ही कामे वेगाने पूर्ण करण्यात येतील. कामे रखडणार नाहीत.
- श्रीनाथ भिमाले, महापालिकेतील सभागृहनेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com