सोमाटणे - पवनमावळातील पवना, कासारसाई, मळवंडी, आढले, पुसाणे धरणामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक. दमदार पाऊस व पाटबंधारे विभागाने केलेल्या पाण्याच्या नियोजनामुळे हा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
पवनमावळ, तळेगाव, देहूरोडसह पिंपरी-चिंचवडची तहान भागविणाऱ्या पवना धरणात उपयुक्त पाणीसाठा 125.98 दशलक्ष घनमीटर, तर एकूण पाणीसाठा 157.12 दशलक्ष घनमीटर आहे. धरणात 52.27 टक्के पाणीसाठा आहे. कासारसाई धरणात उपयुक्त पाणीसाठा 9.38 दशलक्ष घनमीटर, तर एकूण पाणीसाठा 10.70 दशलक्ष घनमीटर असून, धरणात 58.40 टक्के पाणीसाठा आहे. मळवंडी, आढले, पुसाणे, धरणात पन्नास टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वच धरणात या वर्षी दहा टक्के जास्त पाणीसाठा आहे. पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन केले असून, गरजेनुसार आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर केला, तर पाणीकपातीचा प्रश्नच राहणार नाही. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
|