दहावी-बारावीच्या फेरपरीक्षा होणार की नाही? शिक्षणमंत्र्यांनी दिले 'हे' संकेत

SSC-Students
SSC-Students

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या श्रेणीसुधार तसेच फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या परीक्षा होतील याबाबत अद्यापही अनिश्चितता असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील 'कोविड - १९' स्थिती पाहता या परीक्षा आता दिवाळीनंतरच होतील, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या आठवड्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. राज्य मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या पुनर्परीक्षा लांबणीवर पडल्याचे स्पष्ट संकेत गायकवाड यांनी दिले आहेत.

दरवर्षी दहावी आणि बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तत्काळ फेरपरीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी गेल्या काही वर्षांपासून मिळत होती. त्यानुसार दहावी, बारावीचा निकाल साधारणपणे मे महिन्यात जाहीर झाल्यानंतर तत्काळ जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षा घेतली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नव्हते. पण यंदा कोरोनामुळे परीक्षांचे निकाल जुलैमध्ये लागल्याने फेरपरीक्षा अद्याप होऊ शकल्या नाहीत. 

याबाबत राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले म्हणाले, "दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये फेरपरीक्षा घेता येतील का, याची चाचपणी सुरू होती. मात्र त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. केवळ प्राथमिक चर्चा होत होती. मात्र आता मंत्री महोदयांनी सांगितल्यानुसार कोरोनाची स्थिती आणि इतर यंत्रणांची व्यवस्था पाहून फेरपरीक्षेबाबत पावले उचलली जातील. अंतिमत: नोव्हेंबर -डिसेंबरमध्ये परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com