
सोमेश्वरनगर (पुणे) : पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथील पोल्ट्री उद्योगामुळे वायू आणि जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असून, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत मागील एक वर्षापासून प्रशासनाकडे आणि पोल्ट्रीचालकाकडे ग्रामस्थ करत असलेल्या तक्रारीस केराची टोपली दाखविली गेली. अखेर काल दुर्गंधीने काहींना उलट्या झाल्याने आज संतप्त झालेल्या पन्नासेक ग्रामस्थांनी पोल्ट्रीकडे जाणारा रस्ता खोदला असून, पोल्ट्री बंदचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
कर्नलवाडी ग्रामपंचायतीअंतर्गत झिरीपवस्ती येथे हजारो कोंबड्यांचे दहा भव्य पोल्ट्री शेड आहेत. पोल्ट्री गावाच्या पश्चिमेला असल्याने झिरीपवस्तीपासून कर्नलवाडी गावठाणापर्यंत वर्षानुवर्ष त्याची दुर्गंधी येत आहे. या पोल्ट्रीवरील बायोगॅस प्रकल्पामुळे स्लरी बाहेर पडत आहे. त्यामुळे दुर्गंधीत भर पडली आहे. कोंबडीची विष्ठा, स्लरी, मेलेल्या कोंबड्या याची दुर्गंध पसरत आहे. स्लरीमुळे आजूबाजूच्या विहिरीच्या पाण्याचे स्त्रोत खराब झाले आहेत. मेलेल्या कोंबड्यांमुळे कुत्र्यांना, मेंढ्यांना बाधा पोचत आहे. शिवाय माशांचे व डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरातील डाळिंब शेती धोक्यात आली आहे.
याबाबत १९ मे २०१९ रोजी ग्रामसभेत पोल्ट्रीविरोधात ठराव झाला होता. यानंतर प्रदूषण नियंत्रक मंडळ, पोलिस, तहसीलदार, प्रांताधिकारी आदी संबंधित खात्यांकडे पाठपुरावाही केला होता. जानेवारीमध्येही तक्रारी झाल्या. एप्रिलमध्ये संबंधीत पोल्ट्रीचालकास रितसर पत्र देण्यात आले. मात्र, ना प्रदूषण थांबले ना पोल्ट्रीचालकाने काही पावले उचलली. काल स्लरीच्या वासाने काही लोकांना उलट्यांचा त्रास झाला. यामुळे आज पन्नासेक ग्रामस्थांनी जेसीबी घेऊनच पोल्ट्रीकडे मोर्चा वळविला. तक्रारींचा निपटारा होत नाही, तोवर पोल्ट्री बंद, या मुद्द्यावर सगळे एकत्र झाले. याबाबत जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने पोल्ट्रीकडे जाणारा रस्ता उकरला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
याबाबत शरद-विजय सोसायटीचे अध्यक्ष अशोक निगडे यांनी सांगितले की, एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याशी संबंधित पोल्ट्री असल्याने प्रशासन दखल घेत नाही. मला स्वतःला काल उलट्यांचा त्रास झाला. वस्तीचे जिवित धोक्यात आहे. पोल्ट्री बंद केल्याशिवाय ग्रामस्थ गप्प बसणार नाहीत.
याबाबत गेले वर्षभर प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली नाही. उलट पोल्ट्रीव्यवस्थापक अरेरावी करत आहे. आरोग्य, पाणी आणि डाळिंबशेती धोक्यात आली आहे. प्रशासनाने त्वरीत घटनास्थळी दाखल होऊन संतप्त ग्रामस्थांना उत्तर द्यावे.
- सुधीर निगडे,
सरपंच, कर्नलवाडी (ता. पुरंदर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.