कृषी उपसा जलसिंचन योजनेच्या बत्तीस विज पंपाच्या केबल नेल्या चोरून

दीड महिन्यातील ही चौथी घटना : सततच्या केबल चोरीमुळे बळीराजाला लाखो रुपयांचा भुर्दंड
कृषी पंपाची चोरट्यांनी कापून नेलेली केबल
कृषी पंपाची चोरट्यांनी कापून नेलेली केबलSakal

नारायणगाव - येडगाव धरण जलाशयात असलेल्या बत्तीस कृषी विज पंपाच्या सुमारे पाच लाख रुपये किंमतीच्या केबल अज्ञात चोरट्यांनी आज पहाटेच्या सुमारास चोरून नेल्या. केबल चोरीची मागील दीड महिन्यातील ही चौथी तर दोन वर्षातील आठवी घटना आहे. विशेष म्हणजे नारायणगाव पोलीस ठाण्याचे रात्र गस्ती पथक आज पहाटे या भागात भेट देऊन गेले.त्या नंतर केबल चोरीची घटना झाली आहे. सततच्या केबल चोरीमुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून पोलीस सुद्धा हतबल झाले आहेत. पोलीस केबल चोरांचा बंदोबस्त करू शकत नसतील तर न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न बाधित शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

येडगाव भागातील इंदिरानगर, कैलासनगर, हांडे मळा, गणेशनगर, दोन देवळे येथे सुमारे चारशे कृषी उपसा जलसिंचन व नळ पाणीपुरवठा योजनेच्या वीज मोटारी येडगाव धरण जलाशयात आहेत. अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे दोन ते चार वाजण्याच्या दरम्यान सोपान भोर, बाबाजी भोर,निवृत्ती भोर, रोहिदास भोर, प्रकाश लांडगे, वसंत जोरे यांच्यासह भोर, जोरे, नेहरकर आडनाव असलेल्या दोन देवळे परिसरातील येडगाव धरण जलाशयात असलेल्या बत्तीस कृषी विज पंपाच्या केबल कापून चोरून नेल्या. या मुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे पंधरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी येडगाव धरण जलाशयातील इंदिरानगर हद्दीतील ५१ कृषी विज पंपाच्या सुमारे सात लाख रुपये किंमतीच्या केबल पहाटेच्या सुमारास चोरून नेल्या होत्या. त्या नंतर २७ फेब्रुवारी, एक मार्च रोजी पस्तीस कृषी विज पंपाच्या व त्या नंतर आज पहाटे पुन्हा केबलची चोरी झाली आहे. केबल चोरीनंतर शेतकरी नवीन केबल खरेदी करून कृषी पंप सुरू करतात. त्यानंतर पुन्हा चोरी होते. मागील दोन वर्षात केबल चोरी मुळे या भागातील प्रत्येक शेतकऱ्याला दीड ते दोन लाख रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे.

केबल चोरी प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी १२ मे रोजी एक भंगार व्यावसायिक व चार चोरट्यांना अटक केली होती. त्यानंतर दोन मार्च रोजी केसु बोरे याला अटक केली होती. चोरट्यांना अटक करून देखील केबल चोरीचे सत्र थांबत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने मागील तीन वर्षे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा केबलचा खर्च जास्त झाला आहे.

या भागातील शेतकऱ्यांचे शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. बाजारभावाचा अभाव, वाढलेला भांडवली खर्च , नैसर्गिक आपत्ती यामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. साध्य वाढलेले तापमान व भारनियमन या मुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या अडचणीत केबल चोरीची भर पडली आहे. मानवनिर्मित, निसर्ग निर्मित व शासन निर्मित अडचणमुळे शेतकरी पूर्ण हतबल झाला आहे.

- गुलाबराव नेहरकर, (माजी सरपंच येडगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com