मातृभाषेतून शिकल्याने कोणतेही नुकसान नाही - डॉ. जयंत नारळीकर

मातृभाषेतून शिकल्याने कोणतेही नुकसान नाही - डॉ. जयंत नारळीकर

पुणे - ‘‘मातृभाषेतून शिकल्यावर कोणतेही नुकसान होत नाही; मातृभाषेत शिकताना मनावर कोणतेही ओझे नसते. परकी भाषा आधी अवगत करून मग त्यातून शिकणे जास्त अवघड असते. त्यामुळे जी भाषा समजायला सोपी, त्या भाषेतून शिक्षण घेणे अधिक सोयीचे आहे,’’ असे स्पष्ट मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी आज येथे व्यक्त केले.

‘सकाळ’ प्रकाशन वाचक महोत्सवातर्फे डॉ. नारळीकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंगला नारळीकर यांच्याशी भेट आणि गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी नारळीकर दांपत्याची मुलाखत घेतली. या वेळी नारळीकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील अनेक किस्से, प्रसंग सांगितले. डॉ. नारळीकर म्हणाले, ‘‘जी भाषा समजायला सोपी असते त्या भाषेतच शिक्षण घ्यावे. अर्थात, मातृभाषाच समजायला सोपी असल्याने त्यामधूनच शिक्षण घ्यावे. जी भाषा शाळेत आणि आजूबाजूला बोलली जाते त्या भाषेतून विचार करणे सोपे असते. विख्यात शास्त्रज्ञ आइनस्टाईनलाही इंग्रजी भाषा कधीच जवळची वाटली नाही.’’

मंगला नारळीकर म्हणाल्या, ‘‘किमान शैक्षणिक दोन वर्षे तरी मातृभाषेतूनच शिकावे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यावर इंग्रजी अवघड जाते, असा समज आहे. परंतु, त्याचा समतोल साधायला हवा.  तसेच गणिताची आकडेमोड करण्यापेक्षा तर्क लावणे गरजेचे असते.’’

डॉ. नारळीकर म्हणाले, ‘‘ दहावीत असताना भौतिकशास्त्रात मी काठावर पास झालो होतो. मला अतिशय दुःख झाले होते. परंतु, लंडनहून शिकून काही वर्षांनी मी जेव्हा परत शाळेत भेट द्यायला गेलो तेव्हा मला मुख्याध्यापकांनी सांगितले, की दुसऱ्या शाळेचा विद्यार्थी पहिला येण्यासाठी बाहेरच्या परीक्षकांनी मला मुद्दाम कमी गुण दिले गेले होते.’’

या वेळी डॉ. नारळीकरांनी विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानासंबंधी कोडी घातली. त्यानंतर अभ्यास करताना नेमका काय दृष्टिकोन ठेवावा, हे देखील समजावून सांगितले. 

या वेळी बालसाहित्यिकार राजीव तांबे यांच्या कंटाळा घालवणाऱ्या खेळांचा संग्रह ‘घरोघरी खेळा खेळ’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मंगला नारळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नारळीकरांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना असलेल्या विज्ञान क्षेत्रातील शंकांचे नारळीकर सरांनी पूर्ण निरसन केले. कार्यक्रमाला १० शाळांमधून ६०० विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.

डॉ. नारळीकर यांचा मौलिक सल्ला
  आकडेमोड करण्यापेक्षा तर्क लावण्यावर भर द्या.
  एखादा प्रश्‍न समजला नाही तर आव्हान म्हणून स्वीकारा.
  स्वतःचा प्रश्‍न दुसऱ्याला कधीच विचारू नका. त्यामुळे क्षणिक उत्तर मिळेल, परंतु तुमचं नुकसान होईल.
  कायम कुतूहल आणि उत्सुकता जागृत ठेवा.
  तुम्हाला पडलेल्या प्रश्‍नाच्या मुळापर्यंत जा.
  विज्ञान शिकताना नेहमी संयम ठेवा.
  अभ्यास करताना उत्तर मिळालं नाही, तरी विषयाची गोडी कायम ठेवा.
  गणिताचा अभ्यास करताना कायम दोन शक्‍यतांचा विचार करा.
  अभ्यास करताना सगळ्या विषयांना महत्त्व द्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com