जयपूर, इंदोरमधून काढले 58.72 लाख
पुणे - कॉसमॉस बॅंकेवर ऑनलाइन दरोडा टाकून कोट्यवधी रुपये काढून घेतले होते. या प्रकरणातील तिघांना सायबर शाखेने अटक केली. त्यांनी राजस्थान, मध्य प्रदेशातील एटीएममधून 58 लाख 72 हजार रुपये काढून घेतले आहेत.
शाबाज मोहंमद आरिफ ऊर्फ रेहान अली खान (वय 30), आसिफ जमील शेख (वय 31, दोघे रा. मुंब्रा, ठाणे) आणि फिरोज यासीन शेख (वय 37, रा. काळाचौकी, मुंबई), अशी आरोपींची नावे आहेत.
कॉसमॉस बॅंकेच्या सर्व्हरवर मालवेअरचा हल्ला करून रुपे, व्हिसा या डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांची माहिती चोरली होती. त्याद्वारे कोल्हापूर, मुंबई, इंदोर, अजमेर, जयपूर येथील एटीएममधून 94 कोटी 42 लाख रुपये काढले होते. याप्रकरणी चतुःशृंगी ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सायबर शाखेने या प्रकरणात 15 जणांना देशाच्या विविध भागांतून अटक केली आहे.
या गुन्ह्याचा तपास करताना इंदोर येथून पैसे काढलेल्या आरोपींची सायबर पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा राजस्थानातील जयपूर येथून पाच लाख रुपये काढणारा शाबाज खान व इंदोर येथून 53 लाख रुपये काढल्याप्रकरणी आसिफ शेख व फिरोज शेख यांना नौपाडा ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाली. तपासात हे तिघे ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांना पोलिसांनी कारागृहातून ताब्यात घेतले. आसिफ आणि फिरोज हे इंदोर येथील एटीएममधून पैसे काढतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे उपलब्ध आहे, असे वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
|