पुणे - विनायक शिरसाट यांचा खून करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली. "पीओपी' मालाच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादामुळे शिरसाट यांचा खून केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे शिरसाट खून प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
धरमप्रकाश कर्ताराम वर्मा (वय 38, रा. दांगट पाटीलनगर, शिवणे, मूळ उत्तर प्रदेश), मुक्तारअली मसीहुद्दीन अली (वय 34, रा. आंबेगाव, मूळ मध्य प्रदेश), महम्मद फारुक इसहाक खान (वय 28, रा. उत्तमनगर, मूळ उत्तर प्रदेश), अशी संशयित आरोपींची नावे आहेत. शिरसाट हे 30 जानेवारीपासून शिवणे येथून बेपत्ता होते. त्यांच्या अपहरणाची तक्रार देण्यासाठी त्यांचे वडील व भाऊ भारती विद्यापीठ पोलिसांकडे गेले होते.
मात्र पोलिसांनी हरवल्याची तक्रार दाखल करुन घेतली. त्यानंतरही या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला नसल्याचा ठपका त्यांच्या कुटुंबीयांनी ठेवला. दरम्यान, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या आदेशानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली. त्यानंतर शिरसाट यांचा खून करून त्यांचा मृतदेह मुठा गावाजवळील दरीमध्ये टाकल्याचे उघडकीस आले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने सुरू केला. खून प्रकरणातील दोन संशयित व्यक्ती तेलंगणा राज्यात असल्याची खबर सहायक पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, पोलिस कर्मचारी मेहबूब मोकाशी यांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक दीपक निकम यांच्यासह संदीप देशमाने, अजय म्हेत्रे, संजय गायकवाड, अनिल शिंदे, दत्तात्रेय गरुड, दीपक मते, प्रवीण तापकीर, रामदास गोणते, संतोष क्षीरसागर यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली.
मुख्य आरोपी वर्मा हा "पीओपी'ची कामे करतो. त्याचे शिरसाट यांच्याशी व्यावसायिक संबंध होते. त्या दोघांमध्ये "पीओपी' व्यावसायातीलच पैशांच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाला होता. त्याचा राग वर्माच्या मनात होता. वर्मा याने त्याच्या ओळखीच्या मुक्तारअली व महम्मदच्या मदतीने शिरसाटचे अपहरण केले. त्यानंतर त्याच्या स्विफ्ट मोटारीतून शिरसाट यास शहराच्या बाहेर नेऊन जबर मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मुठा गावाजवळील घाटात टाकून दिला.
विनायकने अनधिकृत बांधकामांविरुद्ध आवाज उठविला होता. धरमप्रकाश वर्माला विनायकनेच कामे मिळवून दिली होती. त्यामुळे वर्माला हाताशी धरून "बिल्डरलॉबी'नेच विनायकचा खून केला. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातील खऱ्या आरोपींचा शोध घ्यावा.
सुधाकर शिरसाट, विनायकचे वडील
पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई?
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णू पवार यांनी गांभीर्याने तपास केला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त बच्चनसिंग यांनी दिले होते.
|