निमगाव- वडापुरी मार्गाचे काम संथगतीने
संतोष आटोळे ः सकाळ वृत्तसेवा
इंदापूर, ता. २७ ः जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मार्गावरील बारामती ते अकलूज टप्प्यातील निमगाव केतकी ते वडापुरी (ता. इंदापूर) या मार्गावरील काम संथगतीने सुरू असून, याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
पालखी सोहळ्यातील वैष्णवांची वाट सुकर व्हावी म्हणून या मार्गाचे जिल्हा मार्गावरून राज्य मार्गावर रूपांतर करीत विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये देहू ते पाटसपर्यंत पुणे- सोलापूर महामार्ग व तेथून बारामती मार्गे इंदापूर, अकलूज व पंढरपूर असे पालखी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले. यामधील पाटस ते बारामती हा टप्पा पूर्ण करत तेथील टोल वसुलीही सुरू केली. मात्र, बारामती ते इंदापूर हा टप्पा गेली अनेक वर्षे संथगतीने सुरू आहे. याचा फटका या मार्गावरील प्रवाशांना सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरू असताना योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे वारंवार छोटे- मोठे अपघात घडत असून, याकडे प्रशासन सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. याबाबत संबंधित यंत्रणेने तत्काळ उपाययोजना करत कामाचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. याबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
झाडांकडे दुर्लक्ष
पालखी महामार्गावरील निमगाव केतकी ते इंदापूर शहरापर्यंतच्या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांमध्ये, तसेच दोन्ही बाजूला लावण्यात आलेली झाडे उन्हाची तीव्रता वाढत असताना पाणी न दिल्यामुळे जळून खाक होत चालली आहेत. मात्र, या प्रकाराकडे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणासह संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सूचना फलकांचा अभाव
कुठेही सार्वजनिक काम सुरू असताना त्या ठिकाणी इतरांना त्रास होऊ नये यासाठी कामाबाबत सूचना फलक लावणे आवश्यक असताना संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासारख्या महत्त्वाच्या कामावर ज्या भागात कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी सूचना फलक न लावण्यात आल्याने अनेक वेळा छोटे- मोठे अपघात घडत असून, अनेकांना यामध्ये आपले प्राणही गमवावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
गेली तीन- चार वर्षांपासून पालखी महामार्गाचे काम सुरू असून, यामुळे या भागातून ये- जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच, काम सुरू असताना योग्य ती काळजी घेतली जात नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे. तरी याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.
- खुशाल कोकाटे, अध्यक्ष, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उत्सव कमिटी, इंदापूर शहर
पालखी महामार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी या जुन्या बारामती- इंदापूर राज्य महामार्गाच्या दुतर्फा कडुनिंब, पिंपळ, वड, चिंच यांसह विविध पूर्ण वाढ झालेली झाडे डोलत होती. मात्र, महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर ही झाडे काढण्यात आली. त्यानंतर दुतर्फा वृक्षांचे पुनर्रोपण केले. त्या झाडांनादेखील उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नसल्याने तीही जळून चालली आहेत. यामुळे वारीचा हरित मार्ग ही संकल्पना संपुष्टात येत आहे.
- दत्तात्रेय गुजर, माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, इंदापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

