सांगवीत पाणी पुरवठा योजनेसाठी ८ कोटींचा निधी

सांगवीत पाणी पुरवठा योजनेसाठी ८ कोटींचा निधी

माळेगाव, ता. २० ः बारामती शहराच्या तुलनेत सांगवीसारख्या ग्रामीण भागात गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधा देण्याचा येथील पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्या अनुषंगाने सांगवीमध्ये जीवन प्राधिकरण विभागांतर्गत सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे काम चालू मे महिना अखेरीस सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सांडपाणी, रस्ते, दिवाबत्ती, आरोग्य, शिक्षणासारखी विकास कामे होत असताना बारामती शहराच्या तुलनेत सांगवीचे गावपण टिकून कसे राहील, याकडेही गावच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
सांगवीची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन अजित पवार यांनी ११ मे २०२२ रोजी शासनस्तरावर सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये २१ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव नव्याने उभारला जाणार आहे. १९९०मध्ये बांधलेला जुना तलाव बाजूला करून त्याठिकाणी नविन साठवण तलाव उभारला जाणार आहे. त्यामध्ये ३ लाख १० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी नव्याने उभारली जाणार आहे. याशिवाय पाणी वितरण व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी साडेआकरा किलोमीटर पाइपलाइन टाकली जाणार आहे. याशिवाय नीरा डावा कालवा ते सांगवी साठवण तलाव अशी साडेपाच किलोमीटर पाइपलाइन नव्याने टाकण्याचे नियोजन त्या योजनेमध्ये आहे. सदर कामाचा ठेका आर. बी. कृष्णा कंपनीला मिळाला असून सदरचे काम चालू मे महिना अखेरीस सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यासंबंधी लवकरच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती शासनाच्या जीवन प्राधिकरण विभागाचे (ग्रामीण) उपविभागीय अभियंता राजकुमार जाधव यांनी सांगितले.
याबाबत सरपंच चंद्रकांत तावरे म्हणाले, ‘‘बारामती शहराचा सर्वांगाने विकास होत असताना ग्रामीण भागात सांगवी, माळेगाव, नीरावागज आदी गावांचा चेहरा बदल चालला आहे. त्यासाठी अजितदादा खूप मेहनत घेत आहेत. सांगवी हे दक्षिणेच्या बाजूचे शेवटचे गाव आहे. अधिकची लोकसंख्या, तसेच सामाजिक व राजकीय लक्षवेधी वातावरण असल्याने सांगवीमधील विकास कामांना अधिकचे महत्त्व देते. त्यामुळेच रस्ते, मंदिरे, सार्वजनिक स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा सोडविण्यासाठी येथील पदाधिकारी नेहमीच पुढे येत असतात. त्या अनुषंगाने आम्ही पदाधिकारी भविष्याचा विचार करून मंजूर सुधारित पाणी पुरवठा योजना अधिक चांगली सांगवीकरांच्या उपयोगी पडेल यासाठी काम करीत आहे.’’ यावेळी विजय तावरे यांनीही सांगवीचा सर्वांगिण विकास होत असताना पिण्याच्या पाण्याचे महत्त्व अधिक असल्याचे सांगितले.

गावकऱ्यांचे म्हणणे...
पिण्याच्या पाण्याच्या टाकीची उंची १८ मिटर ऐवजी २२ मिटर असावी, नविन साठवण तलाव ते जुना साठवण तलाव याला जोडणारी पाइपलाइन हावी, पाणी वितरण व्यवस्था करताना पीव्हीसी पाइप ऐवजी काळा जाड पाइप वापरावा, ४० वर्षांपूर्वीची पाणी फिल्टर सिस्टीम अद्ययावत करणे, वीज बिल बचतीसाठी सोलर सिस्टीमचा विचार व्हावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com