
जिल्हाधिकारीच पाठविणार प्रस्ताव
नसरापूर, ता. २७ : खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने शिवापूर टोलनाका स्थलांतरित करण्यासाठी दोन एप्रिल रोजी पुकारलेल्या जन आंदोलनानिमित्त जिल्हाप्रशासनातर्फे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे अध्यक्षतेखाली सोमवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यामध्ये जिल्हाधिकारी यांनी खेड-शिवापूर टोल नाका हटवण्यासाठी मी स्वतः प्रस्ताव पाठवणार असून, टोल नाक्यावरील स्थानिकांना असलेली टोल माफी कायम राहील असे त्यांनी या वेळी जाहीर केले. यामुळे कृती समितीने येत्या २ एप्रिल रोजी होणारे जनआंदोलन तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
बैठकीमध्ये शिवापूर टोलनाक्यामुळे भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यांमधील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत कृती समितीने आक्रमकपणे भूमिका मांडली. आमदार संग्राम थोपटे यांनी १६ फेब्रुवारी २०१९ रोजी कृती समितीने टोलनाक्यावर केलेल्या आंदोलनादरम्यान टोल प्रशासनाने टोलनाका स्थलांतरित होत नाही तोपर्यंत टोल वसुली करणार नाही. अशी भूमिका घेतली होती व तसे पत्र कृती समितीला दिले होते. मात्र, ही टोलवसुली पुन्हा सुरू करण्यात आली. ही टोलवसुली तत्काळ थांबवावी व टोलनाका स्थलांतराचा निर्णय तत्काळ घ्यावा अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. कृती समितीच्या वतीने कृती समितीचे निमंत्रक माउली दारवटकर यांनी टोलनाका हा पीएमआरडीएच्या हद्दीत येत असून वाढती नागरिकीकरण व औद्योगीकरण या भागात झाले आहे. सबब हा टोलनाका या ठिकाणावरून स्थलांतरित होण्यासाठी सर्व पक्षीय आंदोलने केली आहेत. म्हणून या टोलनाक्याचे स्थलांतर होणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. यावर टोल प्रशासनाचे अधिकारी अमित भाटिया यांनी टोलनाका स्थलांतर करण्यास आमची तयारी आहे मात्र याबाबत महामार्ग प्राधिकरणाने निर्णय घ्यावा. अशी भूमिका मांडली.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलन करू नये, असे आवाहन कृती समितीला केले. यावेळी बोलताना टोलनाका स्थलांतराचा प्रस्ताव आता मी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडे पाठवणार आहे. याबाबत संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून ३० मार्च २०२३ रोजी पुढील बैठकीचे नियोजन करण्यात येईल. यानंतर जोपर्यंत टोलनाका स्थलांतराचा निर्णय होत नाही तो पर्यंत स्थानिकांना टोलमाफी देण्याची मागणी टोल प्रशासनाने मान्य करत एक पाऊल मागे घेतले.
या बैठकीमुळे भोर, वेल्हा, मुळशी, हवेली, पुरंदर या तालुक्यातील नागरिकांना अधिकृत ओळखपत्र दाखवून टोलनाक्यावरून टोल मधून सूट मिळणार आहे. याबाबत निर्णय झाला असला तरी टोलनाका स्थलांतराबाबत महामार्ग प्राधिकरणाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास कृती समिती कोणत्याही क्षणी आंदोलन करण्यास तयार आहे. अशी भूमिका शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने जाहीर केली आहे.
या बैठकीस प्रशासनाच्या वतीने भारतीय राष्ट्रीय राजमार्गाने प्रकल्प संचालक संजय कदम,अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, हवेली प्रांत अधिकारी संजय असवले, भोर प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे तसेच कृती समितीच्या वतीने आमदार संग्राम थोपटे, कृती समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर (माऊली) दारवटकर, डॉ. संजय जगताप, शैलेश सोनावणे, जीवन कोंडे, राजेश कदम, स्वप्नील कोंडे, आदित्य बोरगे, दीपक पांगारे, शहाजी आरसूळ, गोरख मानकर, शुभम यादव आदी उपस्थित होते.