पुणे महापालिकेकडून आचारसंहितेपूर्वी गुणवंतांना मिळणार शिष्यवृत्ती
महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते.
पुणे - इयत्ता दहावी, बारावीचा निकाल लागून सहा महिने झाले तरी यंदाच्या अभियांत्रिकी (Engineering) आणि वैद्यकीय (Medical) पदवीचे प्रवेश लांबल्याने महापालिकेच्या शिष्यवृती योजनेचे (Municipal Scholarship Scheme) अर्ज (Form) भरण्यास वारंवार मुदतवाढ देण्यात आल्याने अद्याप गुणवंतांना शिष्यवृत्ती (Scholarship) मिळालेली नाही. या योजनेसाठी १६ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून, अर्जांची छाननी करून निवडणुकीची आचारसंहितेपूर्वी (Code of Conduct) व ३१ मार्चच्या आधी ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पैस जमा करण्याचा प्रयत्न महापालिकेचा आहे.
महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी दहावी व बारावीमध्ये खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहेत आणि महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी आणि ४० टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले तर दहावीच्या विद्यार्थ्यांना १५ हजार आणि बारावीसाठी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
कोरोनामुळे पदवीची प्रवेश परीक्षा लांबणीवर पडली त्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदत वाढविण्यात आली. या मुदतीनंतर महापालिकेकडे इयत्ता दहावीचे ७ हजार ८७८ आणि इयत्ता बारावीचे ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत.
समाजविकास खात्याकडे जसे अर्ज येतील त्यापद्धतीने त्यांची पडताळणी करून बिल तयार केले आहे. आत्तापर्यंत सुमारे ९ हजार अर्जांची पडताळणी झालेली आहे. या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्थसंकल्पात २१ कोटी रुपयांची तरतूद आहे. ही तरतूद ३१ मार्च पूर्वी खर्ची पडणे आवश्यक आहे. तसेच पुणे महापालिकेच्या सभागृहाची मुदत १३ मार्च रोजी संपणार असून, १४ मार्च पासून महापालिकेवर प्रशासन येणार आहे. त्याच दरम्यान निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास रकमेचे वाटप करतानाही बंधने येऊ शकतात.
दोन्ही योजनांचे मिळू १५ हजार ९७४ अर्ज आलेले आहेत. यातील अर्जांची छाननी सुरू असून, आत्तापर्यंत ६० टक्के छाननी पूर्ण झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांना ३१ मार्चपूर्वी थेट बॅंक खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्याच्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- ज्ञानेश्वर मोळक, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
आलेले अर्ज आणि छाननी झालेले अर्ज
इयत्ता दहावी अर्ज - ७८७८
छाननी झालेले अर्ज - ५३६८
कार्यवाही न झालेले - २५१०
शिष्यवृत्तीची रक्कम - १५००० रु.
इयत्ता बारावी अर्ज - ८०९६
छाननी झालेले अर्ज - ४०५५
कार्यवाही न झालेले - ४०४१
शिष्यवृत्तीची रक्कम - २५००० रु.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.