मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नियोजन

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नियोजन

पुणे, ता. २२ : कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात काटे की टक्कर होणार असल्याचे चित्र आहे. तर पोटनिवडणुकीत कमी मतदान होते, हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या मतदारांना घराबाहेर काढत मतदान केंद्रावर आणण्यासाठी भाजप व मित्रपक्ष आणि महाविकास आघाडीने जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी खास विभाग केले असून यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करीत जास्तीत जास्त मतदान व्हावे म्हणून मतदारांना घरी जाऊन संपर्क साधने, पत्रक वाटणे, मतदानाची स्लीप देणे, सोशल मीडियाद्वारे मेसेज करून मतदान करण्याचे आवाहन करणे आणि मतदानाच्या दिवशी मतदारांना केंद्रापर्यंत नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावे, यासाठी प्रशासनाकडून मतदारांमध्ये विविध माध्यमांतून जनजागृती देखील करण्यात येत आहे. यासह कसबा मतदार संघातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, सामाजिक संस्था-संघटना यांना भेटून त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मतदान करावे, याबाबत जनजागृती आणि प्रचार केला जात आहे.

बुथप्रमुखाकडे जबाबदारी
भाजप महायुतीने बुथनिहान नियोजन करून एका कार्यकर्त्यांस ५० मतदारांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मतदारांनी त्या दिवशी मतदान करावे, यासाठीची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच पक्ष पातळीवर विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून देखील त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. एका बूथमध्ये असलेल्या ८०० ते १००० मतदारांना भेटून त्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मतदानाच्या दिवशी यादीनुसार किती मतदान हे तपासून उर्वरित मतदारांना पुन्हा आवाहन करण्याची यंत्रणा तयार करण्यात आली आहे.

पक्षांनी केलेली तयारी
- बुथनिहाय मतदारांमध्ये जनजागृती
- याद्या तपासून त्यानुसार मतदारांना संपर्क
- मतदारांना येण्या-जाण्यासाठीची व्यवस्था
- ज्येष्ठांसाठी वेगळे नियोजन
- उन्हामुळे सकाळीच मतदान करण्याचे आवाहन
- ठिकठिकाणी मेळाव्यांचे आयोजन
- मतदारांच्या स्लीप वाटप
- मतदार केंद्र कुठे आहे याबाबत व्हॉटअपवर लिंक पाठवली जात आहे

मतदानाचा टक्का वाढवा, यासाठी आम्ही मतदार संघातील प्रत्येकाला मतदान करण्याचे आवाहन करीत आहोत. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणात मतदान झाले नाही तर ती एक प्रकारे लोकशाहीची विटंबना आहे. पोटनिवडणुकीला मतदान करण्याबाबत मतदारांत निरुत्साह असतो. मात्र मोठ्या प्रमाणात मतदान झाले तर योग्य उमेदवार निवडला जार्इल.
- अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस

मतदान आपले पवित्र कर्तव्य आहे. आपल्या मनातील उमेदवार केवळ आपल्या मनात न ठेवता तो प्रत्यक्षात निवडणूक येण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आम्ही बूथनिहायन नियोजन केले असून त्यानुसार मतदारांना जनजागृती करण्यात येत आहे.
- माधुरी मिसाळ, निवडणूक प्रमुख, भाजप

मतदानाची टक्केवारी
२००९ - ५१.७८
२०१४ - ६२.११
२०१९ - ५१.६३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com